महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेळघाटात सापडले सात नवे धबधबे; पर्यटकांना खुणावतेय महादेव नदीचे मोहक रूप

मेळघाटात एकाच पारिसरात अतिशय निसर्गरम्य असे 7 धबधबे सापडले आहेत. महादेवाच्या कपरिवरून मोठा धबधबा खाली कोसळतो. या धबधब्यांवर आणखी एक सुंदर धबधबा आहे. हे आजवर या परिसरातील राहिवाशांना माहिती नव्हते. त्यामुळे धारणीतील गोलाई गावाला सौंदर्याची उधळण पहायला मिळत आहे.

By

Published : Aug 4, 2019, 8:16 AM IST

मेळघाटात सापडले सात नवे धबधबे

अमरावती- नैसर्गिक खजिन्याची खाण असणाऱ्या मेळघाटात एकाच पारिसरात अतिशय निसर्गरम्य असे 7 धबधबे सापडले आहेत. मेळघाटातील सर्वात अखेरचे गाव असणाऱ्या गोलाई गावाच्या पाच किमी परिसरात हे धबधबे सापडले आहेत. त्यामुळे श्रावण महिन्यात धबधब्यांच्या सौंदर्याची उधळण पाहायला मिळते आहे.

मेळघाटात सापडले सात नवे धबधबे

अमरावती शहरापासून 195 कि.मी. अंतरावर सातपुडा पर्वताच्या टोकावर गोलाई हे गाव वसले आहे. येथील महादेव मंदिरापासून वाहणार नदी ही महादेव नदी म्हणून ओळखली जाते. या महादेवाच्या कपरिवरून मोठा धबधबा खाली कोसळतो. या धबधब्यांवर आणखी एक सुंदर धबधबा आहे. विशेष म्हणजे हे धबधबे आजवर या परिसरातील असल्याचे माहितच नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले .

धारणीचे तहसीलदार संदीप खडे हे 28 जुलैला मित्रांसह गोलाई गावात ट्रेकिंगच्या निमित्ताने आले होते. त्यांना गोलाई गावाजवळील महादेव नदीवर दोन धबधबे दिसले. मात्र ही नदी आणखी समोरही धबधब्यांच्या स्वरूपात कुठे कोसळते काय, याची उत्सुकता त्यांना लागली. त्यानंतर त्यांनी चौकशी करून गावातील हौशी युवकांना सोबत घेतले. व नदी वाहते त्या दिशेने पहाडावरून खाली उतरले. गिलाई ते दादरा असे एकूण 10 कि.मी.चे खडतर अंतर पार केले. हे अंतर पार केल्यानंतर पहिल्या धबधब्यापासून 5 कि.मी अंतरात एकूण 7 धबधबे त्यांना आढळले. विशेष म्हणजे हे सातही धबधबे आपले स्वतंत्र सौंदर्य जपून आहेत. प्रत्येक धबधबा पाहताना अंगावर शहारे येतात. घनदाट जंगलाच्या या परिसरात सातही धबधब्यापर्यंत पोहचणे म्हणजे मोठा थरार आहे. अनेक ठिकाणी दगडहून पाय घसरतात. यामुळे अनेक ठिकाणी दोरावरून खाली उतरुनच समोरचा प्रवास करावा लागतो.

सहाव्या क्रमांकाचा धबधबा उंचावरुन वाहतो. त्या उंचावरून धबधब्यासोबतच खाली उतरावे लागते. सातवा आणि अखेरचा धबधबा खोल दरीत उंचावरून कोसळताना पाहताना काही वेळ मन स्तब्ध होते. आपण खरोखरच अमरावती जिल्ह्यात आहोत की एखाद्या स्वर्गस्थळी आहो, असा विचार मनात येतो. गोलाई गावातील धबधब्याचे आगळे वेगळे थरारक सौंदर्य पाहण्यासाठी निसर्गप्रेमी पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन तहसीलदार सचिन खडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केले. आपल्या गावात अप्रतिम देखाव्यांचे धबधबे सापडल्यामुळे अडीच हजार लोकसंख्या असणाऱ्या गोलाई येथील रहिवाशांचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे. धबधब्यांमुळे गाव पर्यटनाचे केंद्र व्हावे, अशी अपेक्षा आता ग्रामस्थांना आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details