अमरावती -मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील पांढुर्णा व सावरगाव या दोन गावात मागील अनेक वर्षांपासून पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी जीवघेणा गोटमार खेळ खेळला जातो. मात्र, यावर्षी कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून छिंदवाडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक दोन दिवसांपूर्वी पार पडली होती. या बैठकीत यावर्षी गोटमार न खेळण्याचा निर्णय झाला होता. तरीसुद्धा आज येथे गोटमार हा खेळ खेळण्यात आला. आज झालेल्या गोटमारीत पांढुर्णा व सावरगाव येथील अनेक गावकरी किरकोळ जखमी झाले आहेत.
आज गोटमार हा खेळ पार पडला हेही वाचा -सलमान खानच्या हत्येचा कट उधळला, रेकी करणाऱ्या शार्पशूटरला अटक
दरम्यान, मागील ७ वर्षांपासून दोन्ही गावांपैकी कुणालाही हा ऐतिहासिक झेंडा तोडता आला नाही. मात्र, मागील वर्षी पांढुर्णा येथील युवकांनी हा झेंडा तोडला. यावेळी पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यात या दोन्ही गावातील गोटमार पार पडला.
जाणून घ्या काय आहे गोटमारीचा खेळ..
गोटमार आख्यायिकेनुसार, पांढुर्णा व सावरगाव येथील युवक युवतीने प्रेम विवाह केला होता. या विवाहाला विरोध करत वधूने पांढुर्ण्यात येऊ नये म्हणून गोटमार करण्यात आली होती. त्यात त्या जोडप्याचा मृत्यू झाला होता. त्यांना चंडीमातेच्या मंदिराजवळ समाधी देण्यात आली होती. त्यांच्या स्मृतीचे प्रतिक म्हणून शेकडो वर्षांपासून दरवर्षी ही गोटमार करण्यात येते.
मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक गोटमार खेळली जाते. पोळ्याच्या दिवशी जंगलातून फळसाचे झाड आणले जाते. यासोबतच एक झेंडा लावला जातो. पहाटे तीन वाजताच्या सुमारास हा झेंडा पाढुर्णा व सावरगावच्या दरम्यान असलेल्या जाम नदीमध्ये एका व्यक्तीकडून रोवला जातो. दुसऱ्या दिवशी दोन्ही गावातील नागरिक एकमेंकावर गोटमार करत झेंडा उचलून नेतात. त्यानंतर तो झेंडा चंडीमातेच्या मंदिरात नेला जातो.