महाराष्ट्र

maharashtra

अमरावतीत इच्छूक कोरोनाबधितांवर गृह विलगीकरणात होणार उपचार

By

Published : Jul 31, 2020, 7:35 AM IST

सुरुवातीला दोन दिवस संस्थात्मक विलगीकरण आणि नंतर गृह विलगीकरणाची परवानगी असे त्याचे स्वरूप असेल. गृह विलगीकरण काळात रुग्णासाठी केअर टेकरची व्यवस्था असणे आवश्यक आहे. रुग्णाला घरात 17 दिवसांसाठी विलगीकरणात राहावे लागणार आहे.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल
जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती -इच्छूक कोरोनाबाधित रुग्णांच्या घरी विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था असल्यास त्यांना गृह विलगीकरणासाठी परवानगी देण्यात येणार आहे. 1 ऑगस्टपासून ही प्रक्रिया राबविण्यात येणार, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल


ते म्हणाले, शासनाने रुग्णांच्या गृह विलगीकरणासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील इच्छूक रुग्णांना त्यांच्या घरीच विलगीकरणाची व्यवस्था असल्यास परवानगी देण्यात येईल. त्यासाठी किमान चार खोल्यांचे घर आणि त्यात दोन बाथरुम खोल्यांना जोडून असणे आवश्यक आहे. यामुळे रुग्णाला बाथरुमसह स्वतंत्र खोली राहण्यासाठी आणि उपचारासाठी वापरता येईल. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांची सुरक्षितता जपली जाईल.

ही प्रक्रिया पूर्णतः आकारास येण्याआधी टप्प्याटप्प्याने राबविली जाईल. सुरुवातीला दोन दिवस संस्थात्मक विलगीकरण आणि नंतर गृह विलगीकरणाची परवानगी असे त्याचे स्वरुप असेल. गृह विलगीकरण काळात रुग्णासाठी केअर टेकरची व्यवस्था असणे आवश्यक आहे. रुग्णाला घरात 17 दिवसांसाठी विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यांना आरोग्य सेतु अॅपचा वापर करावा लागणार आहे. त्याशिवाय संपर्कासाठी आणखी एक अॅप विकसित करण्यात येत आहे. तर वृद्ध, जेष्ठ किंवा इतर गंभीर आजारांच्या रुग्णांना गृह विलगीकरणाची परवानगी दिली जाणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रशासनाला एका रुग्णामागे दीड लाख रुपये मिळतात, त्यामुळे रुग्ण संख्या वाढावी यासाठी मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त दाखविले जात असल्याबाबत सर्वसामान्य जनतेत सुरू असणारी चर्चा निरर्थक आहे. जे कोरोना रुग्ण रोज येत आहेत ते बाधित आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवेला लोकांनी बळी पडू नये, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 1 ऑगस्टपासून पी-1 आणि पी-2 प्रणाली बंद होणार आहे. शनिवार- रविवार या दोन दिवशीच संचारबंदी राहील, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details