अमरावती :अमेरिका, चीन जपान अशा जगातील सर्वच देशांमध्ये भारताला विकासाच्या उंच भरारीवर नेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा आज जगभरात होतेय. आज भारताचा सर्वच क्षेत्रात नरेंद्र मोदी यांच्यामुळे विकास होतोय. 2024 मध्ये देखील देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हेच सत्तेत येणार आहेत. यामुळेच सत्तेसोबत राहून आपल्या राज्यातील नागरिकांचा सर्वांगीण विकास साधता यावा, हाच उद्देश समोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याचा निर्णय घेतलाय. अजित पवार यांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्लपटेल (NCP leader MP Praful Patel) यांनी अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे रविवारी आयोजित केलेल्या नवचेतना महासभेत म्हटलंय.
अजित पवार यांनी घेतलेला निर्णय योग्य :राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या सर्व जाती, धर्माच्या नागरिकांनी मनात कुठलाही संभ्रम बाळगण्याचं कारण नाहीय. शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार आम्ही सोडलेले नाहीत. सध्या सरकारमध्ये असणाऱ्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये कुठल्याही प्रकारचा मतभेद नाहीय. येणाऱ्या निवडणुकीत देखील आपल्या पक्षावर आणि कार्यकर्त्यांवर उमेदवारी संदर्भात कुठलाही अन्याय होणार नाही, याची काळजी अजित पवार घेत आहेत. तिन्ही पक्ष सर्व बाजूंनी सकारात्मक विचार करून आणि योग्य असा निर्णय घेतील. तिन्ही पक्ष राज्यातील सर्व घटकांसह महाराष्ट्राच्या हिताचाच निर्णय घेत आहेत. काळाची पावले ओळखून अजित पवार यांनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे, असं खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले. (Amravati Navchetna Mahasabha)
कॉंग्रेसमुळे विदर्भात मागे :काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. निवडणुकीनंतर मात्र सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस सोबतच हात मिळवणी केली. सर्वच निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ हा काँग्रेसचा गड मानून विदर्भात काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला वाढण्याची संधीच दिली नाही. काँग्रेस सोबत गेल्यामुळेच आपण विदर्भात मागे राहिलो, असं खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel Navchetna Mahasabha) म्हणालेत. आता मात्र परिस्थिती बदललीय. मी स्वतः संपूर्ण विदर्भात पक्ष संघटन बळकट करण्यासाठी बाहेर पडलोय. संपूर्ण विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक बळकट आणि महत्त्वाचा पक्ष म्हणून तयार होईल, असा विश्वास देखील प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलाय.