अमरावती -राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर या मेळघाटाच्या पाहणी दौऱ्यावर असताना त्यांनी चित्री गावाजवळ एका शेतकरी तरुणीकडून भाजी विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. दौऱ्या दरम्यान 'विकेल ते पिकेल' या योजनेंतर्गत एक तरुणी भाजीपाला विकत होती. मेळघाट सारख्या दुर्गम भागात या योजनेचे यशस्वी उदाहरण पाहून आपल्याला समाधान वाटल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
हेही वाचा -चिखलदरा येथे 70 हजारांचा गुटखा, सुगंधी तंबाखू जप्त; दोघांना अटक
पालकमंत्र्यांनी घेतला मेळघाटातील विकासकामांचा आढावा
मेळघाटातील दुर्गम गावात पेयजलाच्या उपलब्धतेसाठी जलजीवन मिशनच्या कामांना गती द्यावी, तसेच आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करावे, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मेळघाटातील यंत्रणेला दिलेत. त्याचबरोबर, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामात कुठलीही कुचराई न करता नागरिकांना परिपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
मेळघाटातील दुर्गम गावांत सलग दोन दिवस गोपनीय दौरा केला
पालकमंत्री ठाकूर यांनी मेळघाटातील दुर्गम गावांत सलग दोन दिवस गोपनीय दौरा करून तेथील विकासकामांचा व सुविधांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी गावोगावच्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांच्या निराकरणाचे आदेश प्रशासनाला दिले. प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांच्यासह वनाधिकारी व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.