दर्यापूरात शेतकऱ्याने फिरवला ५८ एकर कपाशीवर ट्रॅक्टर; कपाशीवर बोंंड अळीचा उद्रेक
कपाशी पिकावरील बोंड अळीच्या उद्रेकामुळे दर्यापूर तालुक्यातील १५ शेतकऱ्यांनी एकाच दिवशी ५८ एकर कपाशी पिकावर ट्रॅक्टर चालवून पिक जमीनदोस्त केले आहे. अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकात जनावरे सोडली आहेत.
अमरावती -यंदा कपाशी पिकावरील बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक शेतकरी आपल्या कपाशी पिकावर नांगर फिरवत आहेत. दर्यापूर तालुक्यातील सांगळूदमध्येही अनेक शेतकऱ्यांचे बोंड अळीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे १५ शेतकऱ्यांनी एकाच दिवशी ५८ एकर कपाशी पिकावर ट्रॅक्टर चालवून पिक जमीनदोस्त केले आहे.
जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी फिरवला ट्रॅक्टर
सुरवातीला कपाशीचे चांगले वाढले होते, मात्र परतीच्या पावसाने बोंड सडले आणि त्यानंतर आता बोंड अळीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत शेकडो शेतकऱ्यांनी कपाशी पिकावर ट्रॅक्टर फिरवून उभी पिके नष्ट केली तर, अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकात जनावरे सोडली आहेत. दर्यापुर तालुक्यातील एकट्या संगरुळ शेतशिवारातील 15 शेतकऱ्यांनी 58 एकर कपाशी पिकात टॅक्टर फिरवला आहे.