अमरावती :मे महिन्यातील उन्हाचे चटके कमी होऊन जून महिन्यात पावसाची प्रतीक्षा लागली असतानाच निसर्गातील जांभूळ हे सर्वांना आवडणारा रानमेवा बाजारात विकायला येतात. अमरावती जिल्ह्यात सातपुडा रांगेत मेळघाटच्या जंगलात मोठे जांभूळ वन आहे. या जंगलातील जांभूळ तोडून त्याची विक्री करणाऱ्या आदिवासी बांधवांना सध्या चांगला रोजगार उपलब्ध झाला असून दिवसाला तीन हजार रुपयांपर्यंतची मिळकत जांभूळ विक्रीतून होत असल्याची माहिती सुनील कासदेकर या आदिवासी तरुणाने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
जांभूळ तोडण्यासाठी 40 किलोमीटर पायपीट :मेळघाटात उपलब्ध होणाऱ्या विविध रानमेव्यापैकी जांभूळ हा अतिशय महत्त्वाचा राणमेवा आहे. हे जांभूळ तोडण्यासाठी चिखलदरासह लगतच्या काही गावांमध्ये दहा-पंधरा कुटुंब हे 35 ते 40 किलोमीटर पर्यंत जंगलात पायपीट करतात. जंगलात असणाऱ्या 40 ते 80 फूट वाढलेल्या जांभळाच्या झाडाची जांभूळ तोडणे झाडाखालची जांभूळ वेचणे आणि मोठ्या टोपल्यामध्ये भरून जंगलातून पुन्हा पहाड उतरून तर कधी पहाड चढून पायवाटेद्वारे चिखलदरा येथे पोहोचण्याचा नित्यक्रम सध्या अनेक आदिवासी कुटुंब करीत आहेत.
जांभूळ विकून मिळतात तीन हजार रु: पहाटे पाच वाजल्यापासून जांभूळ तोडण्यासाठी घराबाहेर पडल्यावर जंगलातून चिखलदरा येथे दुपारी बारा वाजायच्या आत येण्याची भली मोठी कसरत या आदिवासी कुटुंबांना करावी लागते. चिखलदरा येथे येणारे पर्यटक यासह स्थानिक सदन रहिवासी शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून या जांभूळचे खरेदी होत आहे. सध्या दिवसाला टोपलीतले सर्व जांभूळ विकून हातात तीन हजार रुपयांपर्यंत पैसे येत आहेत. कधी दोन हजार रुपयांपर्यंत व्यवसाय होतो, तर एखाद वेळी दोन-तीनशे रुपयांवरच समाधान मानावे लागते असे सुनील कासदेकर म्हणाले. चिखलदऱ्यांसह सेमाडोह, हरीसाल आणि धारणी परिसरात देखील अनेक आदिवासी बांधवांना सध्या महिनाभर तरी जांभूळ तोडून विक्री द्वारे रोजगार मिळतो आहे.