अमरावती : काही दिवसांपूर्वी कर्नाटक, आंध्र प्रदेशला लागून असलेल्या सीमा भागातील अनेक गावांनी आम्हाला महाराष्ट्रात राहायचे नाही, अशी भूमिका घेतली होती. आता अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगेत वसलेला धारणी तालुका मध्य प्रदेशात समाविष्ट करा, अशी नवी मागणी जोर धरायला लागली आहे. या संदर्भात 'धारणी मध्य प्रदेश जोडो संघर्ष समिती'चे मुख्य संयोजक श्रीपाल पाल यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. धारणीला मध्य प्रदेशात समाविष्ट करण्यासाठी लवकरच दिशा निश्चित करून आंदोलन करण्याची तयारी देखील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मध्यप्रदेशात समाविष्ट करण्याची मागणी : पूर्वी मेळघाटात अनेक एसटी बस धावायच्या आता गतकाही वर्षांपासून एसटी बस सुविधा कुचकामी झाले आहेत. राज्य शासनाच्या अनियमितपणे बसेस धावत असतात यापेक्षा मध्य प्रदेशातील खाजगी बसेस या बराणपुर, खंडवासाठी नियमितरीत्या धावत आहेत. एकूणच धारणी तालुक्याच्या विकासासाठी ज्या काही सुविधा हव्या त्या सर्व सुविधा महाराष्ट्रापेक्षा मध्यप्रदेशातून उपलब्ध होणे सहज शक्य आहेत. यामुळे अमरावती जिल्ह्यात असणारा धारणी तालुका हा मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यात समाविष्ट करावा, असे श्रीपाल यांनी म्हटले आहे.
अमरावतीपेक्षा बऱ्हाणपूर जवळ : सातपुडा पर्वत रांगेत अमरावती जिल्ह्यात मेळघाटात वसलेला धारणी तालुका हा तीनशे किलोमीटरमध्ये पसरला असून या तालुक्यात छोटी मोठी एकूण 154 गावे आहेत. यापैकी एकूण सत्तर गावही मध्यप्रदेशच्या सीमेवर वसली आहेत. धारणी तालुक्यातील शेवटच्या गावापासून अमरावती शहराचे अंतर हे 190 किलोमीटर आहे. यापैकी 75 किलोमीटरचा रस्ता हा घाटातून जातो. यापेक्षा मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर हा जिल्हा केवळ 80 किलोमीटर अंतरावर असून बऱ्हाणपूर आणि खंडवा ही दोन्ही शहर धारणीला चौपदरी रस्त्याने जोडली आहेत.
आरोग्य सुविधा मध्यप्रदेशमधून : धारणी तालुक्यात आरोग्य सुविधा या अमरावतीपेक्षा बऱ्हाणपूर येथून त्वरित उपलब्ध होतात. रक्ताची गरजही बऱ्हाणपूर येथून भागवली जाते. वीजदेखील मध्य प्रदेशातून मिळत असून एकूणच भौगोलिक दृष्ट्या आणि 1 मे 1960 च्या पूर्वी पूर्वी आम्ही मध्य प्रदेशातच असल्यामुळे आता देखील धारणीवासियांच्या सुविधेसाठी संपूर्ण धारणी तालुका हा मध्य प्रदेशात जोडला जावा, अशी आमची रास्त मागणी असल्याचे आंदोलनाचे प्रमुख श्रीपाल पाल 'ईटीव्ही भारत ' शी बोलताना म्हणाले.
धारणी परिसरातील अडचणी : धारणीपासून अमरावती शहर 145 किलोमीटर अंतरावर असून जिल्हास्तरीय कामासाठी धारणीवरून अमरावतीला जाणाऱ्या व्यक्तीला पूर्ण एक दिवस लागतो. त्याच दिवशी परत येणे शक्य होत नाही. धारणीतील बहुसंख्या आदिवासींना अमरावती शहराबाबत कुठलीच माहिती नसल्यामुळे तिथे गेल्यावर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अमरावतीवरून रात्री धारणीला परतताना जंगलात दोन ते तीन तासापर्यंत रस्ता बंद केला जातो. यामुळे अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांचे प्रचंड हाल होतात.
प्रशासनाचे दुर्लक्ष : अमरावतीचे जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी हे धारणी तालुक्याकडे विशेष लक्ष देत नाही पाच ते सहा महिन्यापर्यंत त्यांचा धारणीला दौरा देखील होत नाही. शैक्षणिकदृष्ट्या देखील धारणी तालुक्यातील शिक्षण व्यवस्था ढासाळली आहे. अमरावतीवरून धारणी तालुक्यात कर्तव्यावर असणारे शिक्षक मोठ्या प्रमाणात रोज अपडाऊन करतात. अनेकदा तर ते शाळेत येत देखील नाहीत. या भागात शिकवण्याची त्यांची इच्छाच नाही केवळ नोकरी म्हणून अनेक शिक्षक नाक मुरडून या ठिकाणी कसेबसे काम करतात या संपूर्ण प्रकारामुळे या भागातील विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या अतिशय मागासला असल्याची खंत देखील श्रीपाल पाल यांनी व्यक्त केली.