अमरावती - जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांना नामनिर्देशन अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडण्याची सक्ती असल्याने इच्छुक उमेदवारांची तारांबळ उडाली आहे. जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी हजारो इच्छुकांच्या अमरावतीच्या समाज कल्याण कार्यालयात रांगाच-रांगा लागल्या आहेत.
ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी येत्या १३ तारखेपर्यंतच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. त्यातच आज धुलीवंदनची सुटी आल्याने समाज कल्याण कार्यालय बंद राहणार आहे. दरोरोज येणाऱ्या लोकांची गर्दी पाहता त्या तुलनेत लोकांना पावत्या कमी प्रमाणात मिळत आहेत. पहिल्या दिवशी आल्यानंतर आधी सहा तास रांगेत उभे राहून त्यानंतर कागदपत्रांची तपासणी एका ठिकाणी केली जाते. त्यानंतर त्यांना टोकन दिल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी पावती मिळवण्यासाठी लांब रांगेत उभे राहून प्रतीक्षा करावी लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे.