अमरावती-जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात सोमवारी (दि. 15 मार्च) चक्क बालविवाह आयोजित करण्यात आला होता. याबाबत माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे पथक घटनास्थळी धडकल्याने हा बेकायदेशीर विवाह थांबविण्यात आला.
माहिती देताना जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तरोडा गावातील घटना
वर्धा येथील रहिवासी असणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विवाह चांदूर रेल्वे तालुक्यात येणाऱ्या तरोडा या गावी सोमवारी सकाळी 10 वाजता होणार होता. दरम्यान, मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती वर्धा येथील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर यांनी अमरावतीचे बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांना दिली. डबले यांनी चांदुर रेल्वे पोलिसांच्या मदतीने तरोडा गाव गाठले. लग्नासाठी मुला-मुलीच्या मध्ये अंतरपाट धरला असताना डाबले यांच्या पथकाने लग्न मंडपात जाऊन लग्न थांबवले यामुळे खळबळ उडाली.
सरपंच अन् पोलीस पाटलांना दिली माहिती
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांनी तरोडा गावचे सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका यांना लाग्नस्थळी बोलावून त्यांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती दिली. तसेच वधू-वर व त्यांच्या नातेवाईकांचीही समजूत काढण्यात आली.
वधू-वर व नातेवाईक समितीसमोर हजर
या प्रकरणात वधू-वर आणि त्यांच्या नातेवाईकांना बाल कल्याण समिती पुढे हजर करण्यात आले. बाल कल्याण समितीचे सदस्य मीना दंडाळे, अंजली घुलक्षे यांच्या समक्ष वधू-वर, नातेवाईक सरपंच, अंगणवाडी सेविका, यांच्याकडून जाबाब तसेच हमीपत्र लिहून घेण्यात आले. त्यानंतर बालिकेस दर 15 दिवसांनी बाल कल्याण समितीसमोर हजर करण्याचे आदेशही देण्यात आले.
हेही वाचा -अत्याचार कराल तर उफाळून येऊ- डॉ. अनिल बोंडे
हेही वाचा -धक्कादायक! चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; आरोपी अटकेत