अमरावती - 'अध्यात्म और विज्ञान से हो संसार का भला', असा संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिला होता. म्हणून त्यांच्या स्वप्नातील समाज घडविण्यासाठी जिल्ह्यातील मोझरी येथे कौशल्य विद्यापीठ स्थापन केले जाणार असल्याची माहिती राज्याच्या कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. तसेच या विद्यापीठासंदर्भात मागच्या सरकारच्या काळातच मी प्रस्ताव सादर केला असल्याचेही त्या म्हणाल्या. राज्याच्या कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर ठाकूर शुक्रवारी पहिल्यांदाच अमरावतीत आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टीने झालेल्या शेतीच्या नुकसानासह विविध कामासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीपूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नामदार ठाकूर पुढे म्हणाल्या, मोझरी येथे सायन्स पार्कची निर्मिती व्हावी, यासाठी मी प्रयत्न केले होते. मात्र, सायन्स पार्कऐवजी कौशल्य विद्यापीठ स्थापन करणे सोयीचे आहे, असे वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात आले, यानंतर मी कौशल्य विद्यापीठासंदर्भात संपूर्ण प्रस्ताव पाठवला होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अध्यात्म सोबतच विज्ञानाची सांगड असणे समाजाच्या हिताचे असल्याचा उपदेश दिला. मोझरी येथे अध्यात्माचे वातावरण आहे. म्हणून अध्यात्म सोबतच विज्ञानाची सांगड घालता यावी, यासाठी कौशल्य विद्यापीठाची निर्मिती केली जाणार आहे. आमच्या भागातील मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होऊन त्यांच्या अंगी कौशल्य विकास व्हावा. हा कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यामागचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.