महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिच्या "प्रेमाने" व धैर्याने त्याच्या कायमस्वरूपी "अपंगत्वालाही" नाही मोजले; मोहिनी झाली दिव्यांग अक्षयचा आधार

अक्षयचे पाय एका अपघातात निकामी झाले होते. पण होणाऱ्या नवऱ्याला कायमचे दिव्यांगत्व आहे, हे माहित असतानाही मोहिनीने त्याच्याशी लग्न करण्याचे ठरविले. मोहिनीने घेतलेला निर्णय हा अक्षयच्या आयुष्याला कलाटणी देऊन एक नवा उमेदीचा किरण देणारा ठरला आहे.

By

Published : Nov 24, 2019, 10:32 AM IST

Updated : Nov 24, 2019, 6:05 PM IST

मोहिनी झाली दिव्यांग अक्षयचा आधार

अमरावती -लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा सुखद क्षण, लग्न झाल्यानंतर नव्या जोडीदारासोबत व्यक्ती आपल्या आयुष्याच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतो. त्यासाठी तो जोडीदारही चांगला पाहतो. दिसायला सुंदर, शरीराने सुदृढ, स्वतःसारखा अनुरूप तसेच इतर सर्व गोष्टी पाहिल्या जातात. पण आपल्या होणाऱ्या नवऱ्याला कायमचे अपंगत्व आहे, हे माहित असल्यावर कुणी लग्न करणार का? असे विचारले तर उत्तर येईल नाही पण, असे घडले आहे. आपला होणारा नवरा हा कायमचा दिव्यांग असूनसुद्धा तिने त्याच्याशी आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले. एकंदरीत काय तर तिच्या प्रेमाने व धैर्याने त्याच्या कायमच्या दिव्यांगत्वलाही मोजले नाही. ही गोष्ट आहे धामणगाव रेल्वे शहरातील अक्षय राठी आणि गव्हानिपाणी येथील मोहिनी खोपडे आणि त्यांच्या प्रेमाची.

मोहिनी झाली दिव्यांग अक्षयचा आधार

अक्षय हा वयाच्या चवथ्या वर्षी कुटूंबासोबत तिरूपती बालाजीला दर्शन घेण्यासाठी गेला होता. पण परतीच्या प्रवासात वाहनाला अपघात झाला. या अपघातात अक्षयचे आई-वडील गंभीर जखमी झाले होते, तर दुर्दैवाने अक्षयचे दोन्ही पाय या अपघातात निकामी झाले. यानंतर आयुष्यात आपले कधी लग्न होईल असा विचार न करता त्याने सर्व लक्ष त्याच्या कामावर केंद्रित केले. आधी त्याने एक सायबर कॅफे सुरू केला होता आणि आता अक्षयची स्वतःची धान्य मिल आहे. मोहिनी ही अंजनसिंगी या गावातील भारतीय स्टेट बँकेमध्ये क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमध्ये सेल्स एक्झिक्युटीव्ह या पदावर कार्यरत आहे. अक्षय हा व्यावसायिक असल्याने बँकेत व्यवहारासाठी तो नेहमी बँकेत जात होता. तिथेच त्या दोघांची ओळख होऊन त्याचे रुपांतर प्रेमात झाले, त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मोहिनीने ही गोष्ट घरच्यांना सांगितली मात्र, तिच्या घरचे अक्षयच्या अपंगत्वामुळे लग्नाला तयार नव्हते. मात्र, मोहिनी ही आपल्या शब्दावर अडून राहिली आणि घरच्यांची समजूत काढत त्यांना लग्नाला तयार केले. तर, अक्षयच्या घरचे देखील त्यांच्या या निर्णयाने खुश आहेत.

हेही वाचा - माझी भविष्यवाणी खरी ठरली, शिवसेनेचे आमदारही संपर्कात - रवी राणा

प्रेम हे प्रेम असतं प्रेमाला असलेला ओलावा हा सहज सुकत नाही. तरीसुद्धा प्रेम करून आपल्या आशा, मोठ्या आकांक्षा प्राप्त करण्यात तरुण-तरुणीची कल असतो. जेव्हा प्रेमाच्या आणाभाका करत लग्न करायची वेळ येते, तेव्हा मात्र अनेकजण नकार देतात. परंतू अक्षय आणि मोहिनीने केलेले प्रेम पूर्णत्वास नेले आणि त्याला आधार दिला मोहिनीच्या खऱ्या प्रेमाने. तिने दाखविलेल्या धैर्याने मोहिनीने माझ्या शरीराशी नाहीतर मनाशी प्रेम केले असल्याचे अक्षय सांगतो. प्रेमात सर्व काही माफ असत असे म्हटल्या जाते.परंतु जातीधर्माच्या नावात अडकलेल्या गोष्टी अजूनही प्रेमाला खटकतात. परन्तु अक्षयवर असलेल्या मोहिणीच्या प्रेमासमोर तिच्या घरचे कुटूंब ही हरले. मोहिनीने घेतलेला निर्णय हा अक्षयच्या आयुष्याला कलाटणी देऊन एक नवा उमेदीचा किरण देणारा ठरला आहे.

हेही वाचा - सरकार स्थापनेचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत, अमरावतीत फटाके फोडून आनंद व्यक्त

Last Updated : Nov 24, 2019, 6:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details