अमरावती -सामाजिक वनीकरण विभागाच्या कुशल कामांतर्गत साडेचार कोटी रुपयांच्या निधीसाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. रोजगार व फलोत्पादन मंत्री संदिपानराव भुमरे यांनी अमरावती जिल्ह्यासाठी साडेचार कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी अमरावती, धामणगाव रेल्वे, चिखलदरा, अचलपूर, धारणी, मोर्शी, तिवसा, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, दर्यापूर, वरूड व नांदगाव खंडेश्वर आदी तालुक्यांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वनीकरणाच्या पुढील कामांना गती मिळणार आहे.
वृक्ष लागवड नियोजन -
‘मी समृध्द तर गाव समृध्द’ या योजनेची 'महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने'शी सांगड घालून यावर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनासह शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ होण्यासाठी व रोजगारनिर्मितीसाठी देखील ही योजना लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.
ग्राम समृद्धी व्हावी लोकचळवळ -
‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ आणि ‘गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’ या विचाराचे एका लोकचळवळीत रुपांतर झाले पाहिजे. विविध योजनांच्या व सर्व यंत्रणांच्या समन्वयातून नियोजनबद्ध काम करण्याचा निर्धार पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.