अमरावती -राज्यमंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांना घेऊन दिल्लीतील किसान मोर्चाला समर्थन देण्यासाठी मोर्चा घेऊन निघाले आहेत. बच्चू कडूंनी अगोदर राज्यातील शेतकऱ्यांवर लक्ष द्यावे आणि नंतर दिल्लीला जावे, अशी टीका भाजपाने केली आहे. बच्चू कडू यांच्या निषेधार्थ गुरुकुंज मोझरीमध्ये आज भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तर, उद्या बच्चू कडू यांच्या बेलोरा गावातही भाजपा आंदोलन करणार आहे.
भाजपाने बच्चू कडू यांच्या दिल्ली भेटीवर टीका केली आहे राज्यातील शेतकरी वाऱ्यावर अन् मंत्री दिल्ली दौऱ्यावर -
राज्यमंत्री बच्चू कडू हे केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांना भडकवत आहेत. महाराष्ट्र सरकाराने सत्तेत आल्यापासून कायम शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवले आहेत. २५ हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे शेतकऱ्यांना मदत दिला जाणार होती. मात्र, ही मदत मिळाली नाही. दूध भाव वाढ देण्यात आली नाही. पावसामुळे विदर्भाचे प्रचंड नुकसान झाले. यासाठी तुटपुंजी मदत देण्यात आली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून बच्चू कडू हे नाटक करत आंदोलनात सहभागी होत असल्याची टीका भाजपाने केली आहे.
बच्चू कडू पोहचले मध्य प्रदेशात -
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो शेतकऱ्यांसोबत राज्यमंत्री बच्चू कडू मध्य प्रदेशमध्ये पोहचले आहेत. त्यांच्या आंदोलनाला मध्य प्रदेशमधील भाजपा सरकारकडून दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी 'ई टीव्ही भारत'सोबत बोलताना केला. आज सकाळी त्यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यानंतर सर्व शेतकरी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. 10 डिसेंबरला ते दिल्लीला पोहचतील