अमरावती - मंदिरे सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपा आक्रमक झाली आहे. राज्यात अनलॉक पाच लागू केले असून यामध्ये अनेक व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. हॉटेल-बारचाही त्यात समावेश आहे. जर हॉटेल-बार उघडे होऊ शकतात तर मंदिरे का नाही? असा प्रश्न उपस्थित करत अमरावती भाजपाच्यावतीने अंबादेवीच्या मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले.
अमरावतीत अंबादेवीच्या मंदिरासमोर भाजपाचे आंदोलन - अमरावती भाजपा लेटेस्ट आंदोलन
गेल्या आठ महिन्यांपासून धार्मिक स्थळे बंद आहेत. अनलॉक सुरू झाले तरी मंदिरे खुली करण्यास परवानगी मिळालेली नाही. या प्रकरणी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
राज्यात अनेक व्यवसाय, हॉटेल, बाजारपेठ, रेल्वे सुरू करण्यात आली आहे. मात्र, धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे त्या मंदिरांवर अवलंबून असणाऱ्या लहान व्यावसायिकांचे हाल होत आहेत. या नागरिकांचा विचार करून तरी सरकारने राज्यातील मंदिरे खुले करावीत, अशी भाजपची मागणी असल्याचे भाजपा शहराध्यक्ष किरण पातुरकर यांनी सांगितले.
भाजपाने आज सिद्धिविनायक मंदिर, शिर्डी साईबाबा मंदिर, नाशिकचे त्र्यंबकेश्वर मंदिर आणि कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराबाहेरही आंदोलने केली आहेत. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यातही तणावपूर्ण स्थिती आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहित त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत त्यांच्या हिंदुत्वाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचे म्हटले आहे.