अकोला - हिवरखेड तेल्हारा राज्य महामार्गाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या अवस्थेत असल्याने 14 मे रोजी पडलेल्या अवकाळी पावसामुळे हा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना वाहने चिखलात असल्याने वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. संचार बंदीच्या काळात शासनाने दिलेल्या आदेशानुसार या रस्त्याच्या कामालाही सुरुवात व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
अवकाळी पावसाने हिवरखेड तेल्हारा रस्ता चिखलमय; वाहन चालकांना करावी लागतेय तारेवरची कसरत अनेक महिन्यांपासून हिवरखेड तेल्हारा या राज्य महामार्गाचे काम रखडले आहे. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा, अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी प्रशासनाला अनेक वेळा दिले आहे. परंतु, प्रशासनाकडून योग्य तो प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी, आता या रस्त्याचे काम पूर्णपणे बंद झालेले आहे. सध्या संचारबंदीमुळे सर्वच व्यवहार ठप्प असताना या रस्त्यावर असणाऱ्या गावातील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी तेल्हारा किंवा हिवरखेड येथे जावे लागत आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांना बी-बियाणे आणण्यासाठीही घराबाहेर पडावे लागत आहे. या रखडलेल्या कच्च्या रस्त्यावरून वाहनचालकांना वाहन चालवताना आधीच जिकिरीचा प्रवास करावा लागत होता. मात्र, आता अवकाळी पावसामुळे रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. पावसामुळे मुख्य रस्त्यावर चिखल असल्यामुळे हा राज्य महामार्ग आहे की पाणंद रस्ता आहे? हे सुद्धा समजेनासे झाले होते. शेतकऱ्यांच्या मोटार सायकल चिखलात अडकत आहेत, तसेच त्यांना पायी चालणे सुद्धा कठीण झाले होते. शेतकऱ्यांना जीवनावश्यक सेवा पुरविणाऱ्या शक्तींना चिखलात माखलेली वाहने काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. हा मार्ग अनेक महिन्यांपासून रखडलेला असल्याने लॉकडाऊन काळात कमी वाहतुकीच्या वेळी या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.