महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुष्काळाची माहिती घेण्यासाठी जिल्हास्तरावर वॉररूमची स्थापना - पालकमंत्री पाटील

दुष्काळग्रस्त गावातील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी जिल्हास्तरावर वॉररूमची  स्थापना करावी आणि पाणी टंचाई व  दुष्काळग्रस्त परिस्थितीचा दररोज सकाळी ठराविक वेळेत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागाशी संपर्क साधून आढावा घेवून उपाययोजना कराव्यात, असे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले.

By

Published : May 19, 2019, 1:43 PM IST

दुष्काळाची माहिती घेण्यासाठी जिल्हास्तरावर वॉररूमची स्थापना - पालकमंत्री पाटील

अकोला- फणी वादळामुळे मान्सूनचा पाऊस येण्यास विलंब होवू शकतो. याची दक्षता घेवून पिण्याच्या पाण्याची टंचाई, गुरांसाठी चारा टंचाई तसेच नागरिकांना रोजगार हमी योजनेतंर्गत कामे मिळण्याबाबत नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे मत पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

दुष्काळग्रस्त गावातील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी जिल्हास्तरावर वॉररूमची स्थापना करावी आणि पाणी टंचाई व दुष्काळग्रस्त परिस्थितीचा दररोज सकाळी ठराविक वेळेत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागाशी संपर्क साधून आढावा घेवून उपाययोजना कराव्यात, असेही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील पाणी टंचाई व दुष्काळ सदृश्य परिस्थीतीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृतहात आढावा बैठकीत ते बोलत होते.

दुष्काळाची माहिती घेण्यासाठी जिल्हास्तरावर वॉररूमची स्थापना - पालकमंत्री पाटील

जिल्ह्यात पाणी टंचाई कार्यक्रम अंतर्गत विंधन विहीर, कुपनलीका, नळयोजना विशेष दुरूस्ती, तात्पुरती पाणी पुरवठा नळ योजना, टँकर, विहीर अधिग्रहण, विहीर खोलीकरण व गाळ काढणे, यासारख्या 569 उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या. त्यापैकी 334 उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून 240 योजना पूर्ण झाल्या आहेत. तर उर्वरीत 94 योजना प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या 137 कोटी रूपयाच्या दुष्काळ निधीचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात टंचाईग्रस्त असलेल्या गावात टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरू आहे. गावातून टँकरची मागणी आल्यावर तत्काळ टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

ज्या ठिकाणी हाताला काम नाही, अशा ठिकाणची मागणी असल्यास महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतंर्गत काम देण्यात येणार आहे. प्रत्येक गावात किमान 4 कामे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

जिल्ह्यातील गावांची चारा उपलब्धतेची माहिती घेवून आवश्यकतेनुसार चारा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सुचना पालकमंत्री यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व स्तरावरून उपलब्ध होणारा चारा 30 जुन 2019 पर्यंत पुरणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी यावेळी दिली.

अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणात पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध असून जुलै अखेरपर्यंत धरणाच्या जिवंत साठ्यातून पाणी पुरवठा होवू शकतो, अशी माहिती जलसंपदा विभागाचे अकुंर देसाई यांनी दिली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते .

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, उपवनसंरक्षक सुधिर वळवी, सामाजिक वनीकरण विभागाचे विजय माने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अरूण वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details