अकोला- तेल्हारा नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र, वान प्रकल्पात शंभर टक्के जलसाठा असताना काही भागात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नगराध्यक्षांसह अधिकाऱ्यांनी पाणीटंचाईचा प्रश्न निकाली काढला नाही. त्यामुळे भाजपच्या नगरसेविका आरती गायकवाड यांच्या नेतृत्वात नगरपालिकेवर आज शनिवारी दुपारी घागर मोर्चा काढण्यात आला.
अकोल्यातील तेल्हारा नगरपालिकेत पाणीटंचाईसाठी घागर मोर्चा - तेल्हारा नगरपालिकेत पाणीटंचाईसाठी घागर मोर्चा
अकोल्यातील तेल्हारा नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या इंदिरानगर भागात अनेक दिवसापासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. ही पाणीटंचाईची समस्या निकाली काढावी यासाठी वारंवार सांगण्यात आले. तसेच निवेदन आणि स्मरणपत्र देखील दिले. मात्र, ही समस्या अधिकाऱ्यांनी निकाली काढली नाही.
नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या इंदिरानगर भागात अनेक दिवसापासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. ही पाणीटंचाईची समस्या निकाली काढावी यासाठी वारंवार सांगण्यात आले. तसेच निवेदन आणि स्मरणपत्र देखील दिले. मात्र, ही समस्या अधिकाऱ्यांनी निकाली काढली नाही. एक महिन्यापूर्वीच नगर परिषद मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, पाणीपुरवठा विभाग, जिल्हाधिकारी, खासदार, आमदार यांना पाणीटंचाईचा प्रश्न निकाली न काढल्याने मोर्चाची माहिती दिली होती. तरीही पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघाला नाही. त्यामुळे आज मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता.
मुख्याधिकारी मनोहर अकोटकर, नगराध्यक्ष जयश्री फुंडकर, पाणीपुरवठा सभापती महेश राठोड यांच्या खुर्चीला फुलांचा हार घालण्यात आला. येत्या ८ दिवसात प्रश्न निकाली काढला नाहीतर साडीचोळी आणि बांगड्यांचा आहेर करण्यात येईल, असा इशारा नगरसेविका आरती गजानन गायकवाड यांनी दिला. यावेळी इंदिरानगर भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.