अहमदनगर- पशु पक्षांचे हुबेहूब आवाज काढणारे, नाटक, गाणी, पारंपरिक कथा व अन्य गुणवैशिष्ट्ये असणारे ठका कुशाबा उर्फ ठका बाबा गांगड (उडदावणे) यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. त्यांना पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री व इंदिरा गांधींच्या हस्ते १९६५ साली सुवर्ण पदक मिळाले होते.
सुवर्ण पदक विजेते ठका कुशाबा यांचे निधन; 'हरहुन्नरी' कलावंत 'हरवला' - इंदिरा गांधी
सन १९६५ च्या प्रजासत्ताकदिनी येथील आदिवासी कलाकारांचे पथक दिल्लीतील राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी झाले. त्यावेळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रथम क्रमांक मिळवला. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री तसेच इंदिरा गांधी यांच्या हस्ते पथकाला सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले.
अकोले तालुक्यातील एका आदिवासी कुटुंबात ठकाबाबाचा जन्म झाला. उडदावणे या दुर्गम गावातच खडकाळ माळरानावर त्यांची शेती होती. घरात ७ माणसे, शेतीला पाण्याचा पत्ता नाही. उपजीविकेचे दुसरे साधन नाही. अशा पार्श्वभूमीवर पशु-पक्षांचे हुबेहूब आवाज आणि अंगी बाणलेल्या ‘नाना कळा’ हेच ठकाबाबांच्या आयुष्याचे भांडवल ठरले. अगदी सहजपणे ते जीभ नाकाला टेकवत. अकोले तालुक्यातील सह्य़ाद्रीच्या या डोंगररांगांमध्ये धुंवाधार बरसणारा पाऊस, रोरावत वाहाणारा बेफान वारा, कडय़ावरून कोसळणाऱ्या धबधब्यांचा धीरगंभीर आवाज, ओढय़ा नाल्यांचा खळखळाट, बिबटय़ांच्या डरकाळ्या, मोरांचे केकाटणे, पशुपक्षांचे मंजूळ आवाज असे निसर्ग संगीत ऐकतच ठकाबाबा कलाकार बनला व लहानाचा मोठा झाला. ते जंगलात गुरे चारायला गेल्यानंतर पशुपक्षांचे आवाज सभोवतालच्या नीरव शांततेत त्यांच्या कानावर पडले. त्यावर तसेच आवाज काढत प्रतिसाद देण्याची त्यांना सवय लागली. त्यातूनच अनेक वन्य प्राणी पक्षांच्या हुबेहूब आवाजाचे कौशल्य ठकाबाबाने लीलया आत्मसात केले. परिसरात भटकंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांपासून तर थेट देशाच्या पंतप्रधानांपर्यंत अनेकांनी त्यांच्या या कलेची प्रशंसा केली. मात्र, या कोरडय़ा कौतुकाने त्यांच्या पदरात काही पडले नाही. ही कला व पारंपारिक नृत्याच्या जोरावर ठकाबाबांनी दिल्लीपर्यंत धडक मारली.
सन १९६५ च्या प्रजासत्ताकदिनी येथील आदिवासी कलाकारांचे पथक दिल्लीतील राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी झाले. त्यावेळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रथम क्रमांक मिळवला. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री तसेच इंदिरा गांधी यांच्या हस्ते पथकाला सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. या पथकात ठकाबाबांचा समावेश होता. पंतप्रधानांच्या इच्छेने काही हवे असल्यास देण्याचे आश्वासनही मिळाले होते. परंतु भोळ्याभाबड्या आदिवासींनी लालबहादूर शास्त्री व इंदिराजी गांधी यांच्या भेटीचेच समाधान मानले. हरहुन्नरी ठकाबाबा वयोमानानुसार थकले. त्यामळे त्याचा परिणाम प्रामुख्याने त्यांच्या या कलेच्या हुन्नरावरच झाला. त्यातील नैसर्गिक धार कमी झाली. या वयात किमान जगण्याची सोय असावी, ही माफक अपेक्षा ते बाळगून होते. मुलाच्या नोकरीची त्यांची अपेक्षा खूप तीव्र होती, मात्र ती अपूर्णच राहिली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व २ मुली असा परिवार आहे. ठकाबाबांना अनेक मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.