महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुजय विखेंचा सोमवारी भाजप प्रवेश निश्चित! आता शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व दरवाजे बंद केले असल्याचे दिसून येत असल्याने अखेर सुजय विखे यांनी भाजपची वाट धरली असल्याचे आता स्पष्ट होत आहे. सुजय विखे सोमवारी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील.

By

Published : Mar 10, 2019, 10:26 AM IST

डॉ.सुजय विखे

अहमदनगर- राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व दरवाजे बंद केले असल्याचे दिसून येत असल्याने अखेर सुजय विखे यांनी भाजपची वाट धरली असल्याचे आता स्पष्ट होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सुजय विखे मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील.

डॉ.सुजय विखे

भाजपकडून अहमदनगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी आणि त्याचबरोबर शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे रिक्त झालेले उपाध्यक्षपद सुजय विखे यांना मिळणार आहे. मात्र, अंतिम क्षणी स्वतः राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात विखे यांच्या उमेदवारीवर चर्चा होऊन शरद पवार हे काँग्रेस पक्षाला जागा सोडण्यास तयार झाले. विखे हे आघाडीकडूनच निवडणुकीत उतरतील. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा या शरद पवारांच्या निर्णयाकडे असतील, याबाबत आज संध्याकाळपर्यंत आश्चर्यकारक घटना घडू शकतात.

१९९१ साली विखे-पवार वादाची पार्श्वभूमी आणि त्यामुळे दुखावलेले मोठे पवार काय निर्णय घेतात, याकडे आज सर्वांचे लक्ष असणार आहे. दुसरीकडे गेल्या ८ दिवसांमध्ये सुजय विखे यांना काँग्रेसकडून किंवा राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळेल, अशी शक्यता मावळत चालली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी ही जागा काँग्रेसला सोडणार नसल्याचे सांगतानाच सुजय विखे यांनाही उमेदवारी मिळेल, अशी कोणतीही चिन्हे राष्ट्रवादीकडून दिसून येत नव्हती. त्यामुळे अपक्ष निवडणूक लढवण्याऐवजी डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात गेल्या २ पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे दिलीप गांधी निवडून आलेले आहेत. मात्र, आता सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशामुळे त्यांच्या उमेदवारीवर गंडांतर येणार आहे. यापूर्वीही २००४ मध्ये भारतीय जनता पक्षाने ना. स. फरांदे यांना उमेदवारी बहाल करत त्यावेळी विद्यमान खासदार असलेल्या दिलीप गांधी यांचा पत्ता कट केला होता. मात्र, त्यावेळी ना. स. फरांदे यांचा पराभव झाला. त्यानंतर २००९ आणि २०१४ या लोकसभा निवडणुकात दिलीप गांधी भाजपकडून लोकसभेवर निवडून आले. वास्तविक नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाची मोठी पक्षबांधणी असतानाही विखे गटाकडून केल्या गेलेल्या राजकारणातून दिलीप गांधी यांचा विजय सुकर झाल्याचे बोलले जाते. याचा राग शरद पवार यांच्या मनामध्ये आहेच. आता स्वतः सुजय विखे हेच भाजपमध्ये दाखल होत असून त्यामुळे पुन्हा एकदा दिलीप गांधी यांना उमेदवारीवर पाणी सोडावे लागणार आहे. याबाबत २ दिवसांपूर्वीच दिलीप गांधी यांना छेडले असता, उमेदवारी मलाच मिळेल. मात्र पक्षाने आदेश दिला तो मानावा लागतो, असे सांगत एक प्रकारे सुजय विखे यांच्यासाठी उमेदवारी सोडणार असल्याचे संकेत त्यांनी दिले होते.

शुक्रवारी मुंबईत सुजय विखे हे भाजपचे संकटमोचन जलसंपदा मंत्री गिरीश बापट यांना त्यांच्या निवासस्थानी तासभर भेटले आणि लगोलग शनिवारी बापट यांनी अचानक नगरमध्ये भेट देत नगर दक्षिणमधील प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन उमेदवारीबाबत चर्चा केली. ही चर्चा करत असताना नगर शहरात वास्तव्यास असलेले खासदार दिलीप गांधी हे मात्र बैठक संपताना दाखल झाले. त्यानंतर माध्यमांना महाजन यांनी ही नियमित बैठक असल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले. तरीही नगरमधून मुंबईला परतत असताना आपल्या हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्यासोबत सुजय विखेही होते. त्यामुळे एकंदरीतच आता सुजय विखे यांचा भाजप प्रवेश हा अंतर्गत पातळीवर निश्चित झाला असल्याचे चित्र आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी मुख्यमंत्री फडवणीस यांच्या हस्ते त्यांना पक्ष प्रवेश दिला जाणार आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या भूमिकेकडे लक्ष ...

विखे परिवार आतापर्यंत जास्त काळ काँग्रेस पक्षामध्ये असला तरी १९९५ मध्ये बाळासाहेब विखे आणि राधाकृष्ण विखे या पिता-पुत्रांनी शिवसेनेत प्रवेश करून केंद्रात आणि राज्यात मंत्री पदे मिळवली होती. मात्र, त्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले. पुढे काँग्रेस पक्षाकडून राधाकृष्ण विखे यांना राज्याचे कृषीमंत्री पदही देण्यात आले. २०१४ मध्ये काँग्रेसने विखे यांना महत्त्वाचे विरोधी पक्षनेतेपद दिले. सध्या एकीकडे राधाकृष्ण विखे हे विरोधी पक्षनेते आहेत, तर त्यांच्या पत्नी शालिनी विखे या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष आहेत. स्वतः सुजय विखे पद्मश्री विखे पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. ही सर्व महत्त्वाची पदे असतानाही गेल्या ३ वर्षांपासून सुजय विखे यांनी नगर दक्षिण मतदारसंघात आपल्या जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय कारणास्तव अनेक कार्यक्रम घेत जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. गेल्या ६ महिन्यांपासून सुजय विखे हे नगर दक्षिण मतदारसंघ पिंजून काढत असून प्रत्येक महत्त्वाच्या सर्वच गावात त्यांच्या आतापर्यंत किमान एक सभा पार पडली आहे.

गेल्या २ लोकसभा निवडणुकांत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पराभवाचे कारण देत आणि आपण या मतदारसंघात केलेल्या कामाचा आढावा सुजय आणि राधाकृष्ण विखे यांनी आघाडी समोर मांडत ही जागा काँग्रेससाठी सोडावी, अशी मागणी सातत्याने लावून धरली होती. अखेरच्या क्षणापर्यंत ही जागा काँग्रेसला दिली जाईल, अशी अपेक्षा असली तरी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले मन घट्ट करत कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जागा राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवारच लढवेल, असे स्पष्ट केले. सुजय विखे यांना एक प्रकारे उमेदवारी देण्याचेही नाकारले होते. या परिस्थितीत अपक्ष निवडणूक लढवल्यास तिरंगी लढत होऊन यामध्ये पराभवाचा धोका दिसून येत असल्याने सुजय विखे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाबाबत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सुजय माझा मुलगा असला तरी राजकीय निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे, असे सांगत मुलाची पाठराखण केलेली दिसून येत आहे. त्यामुळे आता सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे यांच्याबाबत पक्ष काय भूमिका घेतात किंवा स्वतः राधाकृष्ण विखेही भाजपमध्ये प्रवेश करणार का? याबद्दल आता मोठी उत्सुकता आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्ष त्यांचे विरोधी पक्षनेतेपद काढणार नाही, असे बोलले जाते. त्याचबरोबर स्वतः राधाकृष्ण विखे काँग्रेसमध्येच राहिल्याने हा दुहेरी राजकीय खेळ कसा आकार घेईल त्यानुसार निवडणुकीच्या निकालानंतरच पुढील निर्णय घेतील, असे दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details