महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोदीजी दुसऱ्याच्या घरात डोकावणं बरं नव्हं -  शरद पवार

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते.

By

Published : Apr 17, 2019, 8:53 AM IST

Updated : Apr 17, 2019, 9:31 AM IST

संपादीत छायाचित्र

अहमदनगर -नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तुफानी हल्लाबोल केला. ज्यांना स्वतः ला घर नाही त्यांनी दुसऱ्याच्या घरात काय चाललंय हे डोकावून पाहू नये, अशी मार्मिक टीका शरद पवार यांनी मोदींवर केली.

अहमदनगर येथील सभेत बोलताना शरद पवार

शरद पवार म्हणाले की, आम्ही भावंडे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलो तरी आमचे कुटुंब आजही एक आहे. सणासुदीला आम्ही एकत्र येत असतो. मात्र, मोदी म्हणतात माझा पुतण्या सर्व राजकारण हातात घेऊ पाहतो आहे. बरं झालं मोदींना माझ्या पुतण्याचे कर्तृत्व कळाले. पण वस्तुस्थिती अशी आहे माझ्या आईवर शाहू-फुले-आंबेडकरांचा प्रभाव होता. त्यामुळे तिने आम्हा भावंडात एकोपा शिकवला जो आजतागायत सुरू आहे. पण ज्यांना घरच नाही त्यांना ही गोष्ट कशी समजणार असा सवाल पवार यांनी मोदींना उपस्थित केला.

मी इकडे का? याचे पवारांनी दिले उत्तर

पंतप्रधान मोदी सध्या भाषणातून माझे एकीकडे कौतुक करताना, लेकिन पवार साहब आप उधर कैसे? असा सवाल उपस्थित करत आहेत. यावर शरद पवार यांनी मोदींना प्रतिउत्तर देताना आपण मुळातच नेहरू-गांधी विचाराचे असल्याचे सांगितले. आपण इयत्ता नववीत प्रवरा नगर येथे शिकत असताना पहिले आंदोलन नगर जिल्ह्यात केल्याच्या आठवणीला उजाळा दिला. तेव्हा पासून आजतागायत आपण गांधी-नेहरू विचारात वाढलो आणि अनेक वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्याचे सांगितले. काही तात्विक मुद्यावर मतभेद असले तरी आपण गांधी-नेहरूंचा विचार कधी सोडला नाही, त्यामुळे मोदीजी मी इकडे आहे असे पवार म्हणाले.
एकदा इस्त्रायला शेतीविषयक कॉन्फरन्सला देशातील काही मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन गेलो होतो, त्यात मोदी पण होते. त्यावेळी मी त्यांना जिज्ञासा म्हणून मी शेतीतील काही गोष्टी सांगितल्या. आता त्याचाच आधार घेत मोदी हे मैं उनकी उंगली पकडकर बहुत कुछ सिखा, असे सांगत असल्याचा खुलासा पवार यांनी यावेळी केला.

पुढील पन्नास वर्षासाठी नवं नेतृत्व निर्माण करतोय

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी त्यावेळी माझ्या सारख्या तरुणांना राजकारणात संधी दिली. नेत्यांनी निवृत्त होण्यापूर्वी पुढील पन्नास वर्षांचा विचार करून नवीन नेतृत्व निर्माण केले पाहिजे, असे चव्हाण साहेब सांगत. आता मी मधुकर पिचड आदींवर पुढील पन्नास वर्षांचा विचार करून नवीन युवा पिढीला संधी दिली आहे. त्यासाठी मी नगर जिल्ह्यातून आ. संग्राम जगताप, आ.राहुल जगताप, वैभव पिचड यांना पुढे आणले आहे. आ. संग्राम हे खासदार होऊन त्यांनी दिल्लीत काम करावे यासाठी मी वारंवार नगरला येत असल्याचे पवार सांगितले.

आमच्याकडे पाहण्यासाठी कायमचे रवाना करून द्या - बाळासाहेब थोरात

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी युतीचे उमेदवार सुजय विखें यांच्यावर टीकास्त्र सोडले. सुजय हे दमबाजीचे वक्तव्य करत असून आमच्याकडे पाहून घेण्याची भाषा वापरत आहे, त्यामुळे दक्षिणेतील मतदारांनी त्यांना २३ एप्रिलला पराभूत करून आमच्याकडे पाहण्यासाठी कायमचे रवाना करून द्यावे, असे खोचक वक्तव्य केले. तर डॉ. सुजय यांचे चुलते अशोक विखे यांनी सुजय खाजगी संस्थेतून डॉक्टर झाला आहे आणि खाजगी संस्थांची अवस्था पाहता तो कसा डॉक्टर असेल हे समजून घ्या, असे म्हणत डॉ. सुजय यांच्या शिक्षणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

शहरातील मार्केटयार्ड चौकातील पंजरपोळ मैदानात झालेल्या सभेस ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. अरुण जगताप, महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा चित्रा वाघ, आ. वैभव पिचड, आ. राहुल जगताप, घनश्याम शेलार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते. सभेला दक्षिण भागातून समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Last Updated : Apr 17, 2019, 9:31 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details