शिर्डी -(अहमदनगर)- जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याचप्रमाणे संगमनेरमध्येही कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याच्या सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आहेत.
थोरात म्हणाले, कोरोना हे मानवजातीवरील संकट आहे. त्याचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. हे संकट अजून संपलेले नाही. लॉकडाऊनमधील शिथिलता ही पूर्णपणे मोकळीक नसून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येक नागरिकाने शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याबरोबरच स्वयंशिस्त पाळावी. जे नागरिक नियम पाळत नाही त्यांना प्रशासनाने नियम पाळण्यास भाग पाडावे.
संगमनेर येथे कारखाना कार्यस्थळावर कोरोना उपाययोजनांबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, प्रांताधिकारी शशिकांत मंगळुरे, तहसीलदार अमोल निकम, डॉ.हर्षल तांबे, डॉ.सचिन बांगर, सुरेश शिंदे, पोलीस निरिक्षक अभय परमार, डॉ.सुरेश घोलप, डॉ.संदिप कचोरिया आदि यावेळी उपस्थित होते.
थोरात पुढे म्हणाले, कोरोना हा अदृश्य शत्रू आहे. मागील तीन महिन्यांत लॉकडाऊनमुळे त्याची वाढ रोखण्यात यश आले आहे. 75 दिवसानंतर राज्यात मिशन बिगीनअंतर्गत लॉकडाऊनच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. मात्र नागरिकांनी ही पूर्णपणे मोकळीक नाही हे लक्षात घ्यावे. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नसून काही भागात संक्रमणातून वाढू पाहत आहे. त्याची साखळी तोडण्यासाठी शासनाने जारी केलेल्या नियमांबरोबर प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे महत्वाचे आहे.
हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना नियम पाळण्याची सवय लावावी. संगमनेरमध्ये टेस्टिंग वाढविण्यात आल्या असून ‘थ्री टी’ फॉर्म्युल्यानुसार ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करा, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच या संकटात कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करतांना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणातील नागरिकांनी घाबरुन जावू नये असे आवाहन त्यांनी केले.
अहमदनगर जिल्ह्यात कोरोना-
अहमदनगर जिल्ह्यात आज(सोमवारी) १८ रुग्णांनी कोरोनावर मात. यात, नगर मनपा १०, संगमनेर ०४, राहाता ०३ आणि नगर ग्रामीण मधील एका रुग्णाचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४१८ इतकी आहे. तर १८३ जणांवर उपचार सुरू आहेत.