महाराष्ट्र

maharashtra

पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरण : कोपरगावपासून सुरू झालेला समस्यांचा ससेमिरा पुण्यापर्यंत कायम

By

Published : Sep 3, 2020, 8:02 AM IST

अहमदनगर येथील रहिवासी असलेले आणि पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना अहमदनगर आणि पुण्यात देखील उपचार मिळाले नाहीत. तसेच रुग्णालय प्रशासनाने दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवारातून होत आहे.

reporter pandurang raikar died  पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरण  reporter pandurang raikar died incident investigation  पत्रकार पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरण चौकशी
पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरण

अहमदनगर - पुणे येथील खासगी वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडूरंग रायकर यांचे उपचाराअभावी निधन झाले. उपचारासाठी कोपरगावपासून सुरू झालेला त्यांच्या समस्यांचा ससेमिरा पुण्यापर्यंत कायम राहिला. सुरुवातीला कोपरगाव येथील आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये रायकर गेले असता रुग्णालयाची मुजोरी समोर आली आहे. अगोदर पैसे भरा, त्यानंतरच उपचार करू, अशी भूमिका रुग्णालयाने घेतल्याने कोरोनाबाधित रुग्णांची ससेहोलपट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्रकार असणाऱ्या रुग्णासोबत हा प्रकार घडल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरण : कोपरगावपासून सुरू झालेला त्यांच्या समस्यांचा ससेमिरा पुण्यापर्यंत कायम राहिला

पुणे येथील पत्रकार पांडूरंग रायकर यांचा रुग्णालयाच्या हलागर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. तसेच त्यांना आडमुठेपणामुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. कोपरगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये तपासणीत रायकर यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पीटलमध्ये जाण्याचा सल्ला कोपरगावचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसौंदर यांनी दिला. रिपोर्ट घेऊन ते आत्मा मालिक हॉस्पिटलला गेले असता चाळीस हजार भरा त्यानंतरच अ‌ॅडमिट करता येईल, अशी आडमुठेपणाची भूमिका रुग्णालय प्रशासनाने घेत दाखल करण्यास नकार दिला. त्यांना श्वास घेण्यासाठी मोठा त्रास होत असताना रुग्णालयाने रुग्णाकडे दुर्लक्ष केले. काही रक्कम भरण्याची तयारी दर्शवूनही रुग्णालय व्यवस्थापनाने दोन तास त्यांना गेटवरच ताटकळत ठेवल्याचेही आरोप कुटुंबीयांकडून होत आहेत.

जिल्हाधिकारी आणि तहसीलदार योगेश चंद्रे यांना पत्रकारांनी संपर्क केला, तेव्हा रुग्णालय प्रशासन जागे झाले. रायकर यांच्यासोबत एका दैनिक वृत्तपत्राचे कोपरगाव येथील प्रतिनिधी स्वतः होते. त्यांनी रुग्णालयाचे व्यवस्थापक अमित फडतरे यांना सांगूनदेखील त्याचा फारसा उपयोग झाला नाही. रुग्ण दाखल करताना डिपॉझीट घेत असल्याचे रुग्णालयाचे व्यवस्थापक फडतरे यांनी कबूल केलेय.

कोपरगाव येथील पत्रकारांनी या समस्या जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांना सांगितल्या. त्यावेळी रुग्णालयाच्या वतीने हालचाली सूरू झाल्या. मात्र, रुग्णालयाकडून अधिकाऱ्यांच्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवण्यात आली. अधिकाऱ्यांचे फोन झाल्यानंतर रुग्णालयाने रुग्णाला दाखल केल्याची खोटी माहिती दिली. त्यानंतर अर्धा तास रुग्ण गेटवरच आहे त्या अवस्थेत होता. स्थानिक पत्रकार आणि सामाजिक संघटनेने धारेवर धरल्यानंतर रुग्णालयाचे गेट उघडून रुग्णाला दाखल करण्याचे नाट्य केले, असेही आरोप केले जात आहेत. येथे उपचार मिळणार नाहीत, अशी खात्री झाल्यानंतर स्थानिक पत्रकार आणि विविध संघटनेने त्यांना उपचारासाठी पुणे येथे पाठवले. मात्र, पुण्यातही उपचार मिळाले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला, असल्याचे सुत्रांनी सांगितले.

दरम्यान, सरकारचेच आरोग्य ठिकाणावर नाही, त्यामुळे जनतेचं आरोग्यही धोक्यात आलंय. हे सरकार फक्त चमकोगिरी करणारे सरकार आहे. कोपरगाव येथील रुग्णालयाची अडवणूक आणि पुण्यात झालेली अनास्था या प्रकारांची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी करण्याची मागणी भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

पांडुरंग रायकर मृत्यूप्रकरणी चौकशी समिती -

पत्रकार पांडुरंग रायकर यांचा बुधवारी पहाटे जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये मृत्यू झाला. कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांच्यावर या कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. रुग्णालयांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप रायकर यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये काही कमतरता होती का? याची चौकशी करण्यासाठी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details