अहमदनगर - शिर्डी शहराच्या स्वच्छतेसाठी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था दरमहा शिर्डी नगर पंचायतला देत असलेल्या निधीत गैरव्यवहार होत असल्याचा ठपका ठेवत शहरातील महाविकास आघाडीने नंगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारत निवेदन दिले आहे. शिर्डी नगरपंचायतने साईबाबा संस्थानला विनंती करून दरमहा ४२,५१,९९९ रुपये मंजूर केले आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून ठरलेली रक्कम साईसंस्थान नगरपंचायतला वर्ग करत आहे. शहराच्या स्वच्छतेचा ठेका पंचायतने बिव्हीजी कपंनी पुणे यांना पाच वर्षांसाठी देऊ केला आहे. यात स्वच्छतेपोटी होणाऱ्या खर्चाचा तपशील संबधीत ठेकेदाराने नगपंचायत आणि साई संस्थान केला असून त्यात कर्मचाऱ्यांना १४,७२० रुपये इतकी वेतन रक्कम नमूद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र बीव्हीजी कंपनी कमर्चाऱ्यांना साधारण ९ हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करत असल्याची बाब समोर आली आहे. नगर पंचायतमधील नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी मुख्याधिकारी सतीश दिघे यांना याबाबत जाब विचारला आहे.
ठेकेदाराने सफाई काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला ठरलेला पगार देणे महत्त्वाचे असून फक्त नऊ हजार रुपये दिले जात आहेत. ठेकेदाराकडे १५७ कर्मचारी असून दर महिन्याला साधरण आठ लाख रुपये कोणाच्या खिशात जातात असा सवाल यावेळी शिर्डीकरांनी उपस्थित केला आहे. यावेळी नगराध्यक्ष कैलास कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, नगरसेवक अभय शेळके, सुजीत गोंदकर,दत्तू कोते, शिवसेनेचे कमलाकर कोते, विजय जगताप, सत्ताधारीगटाचे नितीन उत्तमराव कोते, गणेश गोंदकर आणि निवेदन स्वीकारण्यासाठी शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी सतीश दिघे आदी उपस्थित होते.