महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एक विवाह असाही.. दुष्काळाच्या झळा व पाणी टंचाईच्या स्थितीत चारा छावणीत पार पडले शुभमंगल..

शेतकऱ्यांच्या धनलक्ष्मीच्या उपस्थितीत मांडवगण येथील कै. किसन नाना जाधव यांचे चिरंजीव अनिल व औरंगाबाद येथील मारुती देवराम वानखेडे यांची कन्या पुजा यांनी लग्नाची रेशीमगाठी बांधली.

By

Published : Apr 19, 2019, 12:34 PM IST

चारा छावणीत पार पडले शुभमंगल..

अहमदनगर- बिकट आर्थिक परस्थितीमुळे जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील चारा छावणीत पार पडलेला एक लग्न सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. समाजभान ठेवत पार पाडला गेलेला हा विवाहसोहळा सत्तेसाठी आसुसलेल्या सर्वच राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा म्हणावा लागेल.

चारा छावणीत पार पडले शुभमंगल..

एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. लाखो-कोट्यवधींचा चुराडा होत आहे. पक्ष बांधिलकी, विचारधारा खुंटीला टांगून राजकारणी सत्ता मिळवण्यासाठी मश्गुल असताना दुसरीकडे नापिकी, कर्जबाजारीपणा, दुष्काळाच्या झळात सर्वसामान्य बळीराजा रंजला-गांजला जात असला तरी त्याचे प्रश्न-समस्या आणि मूलभूत गरजांकडे लक्ष द्यायला राजकारण्यांना वेळ नाही. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी हतबल शेतकरी आत्महत्येकडे वळत असला तरी समाजात एक वास्तवाचे समाजभान ठेवून असलेला वर्गही आहे. तो या बिकट परिस्थितीत जमेल त्या पद्धतीने मदतीचा हात देत आशेचा किरण जागवत गराजवंतांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथे जनावरांच्या छावणीत गुरुवारी एक विवाह सोहळा पार पडला. मांडवगण येथील जनावरांच्या छावणीत ८११ जनावरे आहेत. शेतकऱ्यांच्या धनलक्ष्मीच्या उपस्थितीत मांडवगण येथील कै. किसन नाना जाधव यांचे चिरंजीव अनिल व औरंगाबाद येथील मारुती देवराम वानखेडे यांची कन्या पुजा यांनी लग्नाची रेशीमगाठी बांधली.
नवदाम्पत्यांच्या खरची परिस्थिती हालाखिचीच आहे. दोन्ही कुटुंबांची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन युवा कार्यकर्ते महेश तोगे यांनी हा विवाह मांडवगण जनावरांच्या छावणीत करण्याची संकल्पना मांडली. त्यास दोन्ही परिवाराने मान्यता दिली. श्रीगोंदा येथील वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेटच्या माध्यमातून विठ्ठलराव वाडगे यांनी वऱ्हाडाच्या भोजनाची व्यवस्था केली. छावणीतील पशुधन आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत गरीब कुटुंबातील वधू वरांच्या डोक्यावर अक्षदा पडल्या. यावेळी वधू वरांना सिद्धेश्वर देशमुख, बाळासाहेब लोखंडे, विठ्ठलराव वाडगे यांनी शुभेच्छा दिल्या.

विठ्ठलराव वाडगे यांचे समाजभान इतरांसाठी अनुकरणीय-
मांडवगण येथील ओम चैतन्य आणि वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेटचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव वाडगे यांनी सरकारी चारा छावणी सुरू केली आहे. दुष्काळाने होरपाळणाऱ्या बळीराजासाठी अनेक सुविधा त्यांनी छावणीत केल्या आहेत. छावणीत देवीची मूर्ती स्थापित केली असून एकोप्याची भावना निर्माण व्हावी म्हणून विविध कार्यक्रम ते घेत आहेत. अनिल जाधव याची बिकट आर्थिक परिस्थिती पाहता लग्न सोहळ्याच्या खर्चाचा प्रश्न त्यांना समजल्यावर त्यांनी चारा छावणीत लग्न सोहळा पार पाडण्याचा निर्णय घेतला. यापुढेही गरजवंतासाठी चारा छावणीत लग्न सोहळा ते आयोजित करणार आहे. इतर छावणी चालकांनीही या उपक्रमाचे अनुकरण करून शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details