महाराष्ट्र

maharashtra

नैसर्गिक आपत्तीत प्रत्येक विभागाला दिलेल्या जबाबदारीचे तत्परतेने पालन करा - योगेश चंद्रे

By

Published : May 27, 2021, 4:56 PM IST

कोपरगाव तालुक्यात संभाव्य नैसर्गिक आपत्ती निर्मूलन आणि व्यवस्थापन संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.

कोपरगाव न्यूज
नैसर्गिक आपत्तीत प्रत्येक विभागाला दिलेल्या जबाबदारीचे तत्परतेने पालन करा - तहसिलदार योगेश चंद्रे

अहमदनगर -कोपरगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पावसामुळे संभाव्य पूर, ढगफुटी यावर करण्यात येणार्‍या उपाययोजना यासह नैसर्गिक आपत्तीत प्रत्येक विभागाला दिलेल्या जबाबदारीचे पालन करत विभागाने खातेनिहाय बैठक घेऊन सुक्ष्म नियोजन करावे आणि नैसर्गिक आपत्तीमधे नागरिकांना दिलासा द्यावा, अशी सूचना कोपरगावचे तहसीलदार तथा घटना व्यवस्थापक योगेश चंद्रे यांनी केली. कोपरगाव तालुक्यात संभाव्य नैसर्गिक आपत्ती निर्मूलन आणि व्यवस्थापन संदर्भात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, निवासी जिल्हाधिकारी संदिप निचित, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित कोपरगाव तालुक्यातील सर्व तालुका स्तरावरील शासकीय अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन तहसिल कार्यालय येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

यांचीही होती बैठकीला उपस्थिती
बैठकीला पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग सहायक अभियंता प्रशांत वाकचौरे, शाखा अभियंता डी. बी. गाडे, जि. प. सा. बां. विभाग उत्तमराव पवार, पशु संवर्धन सहायक आयुक्त डॉ. अजयनाथ थोरे, वीज वितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगवंत खराटे, भूमी अभिलेख संजय भास्कर, गोदावरी डावा कालवा उपविभागीय अधिकारी भरत दिघे, भारत संचार निगमचे कनिष्ठ दूरसंचार अभियंता गौतम मेश्राम, पूरनियंत्रणचे अभियंता धीरजकुमार हंस, संजय पाटील,शिक्षण विभाग विस्तार अधिकारी शबाना शेख, कोपरगाव नगरपरिषद फायर ब्रिगेड अधिकारी संभाजी कार्ले, वनक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके, तुरुंग अधिकारी शंकर दुशिंग यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

'नागरिकांना स्वतंत्रपणे मार्गदर्शक माहिती उपलब्ध करून द्यावी'
या बैठकीत तहसिलदार तथा घटना व्यवस्थापक योगेश चंद्रे यांनी, कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी काठावरील २८ गावांचे व्यवस्थापन, बंधारे, नाले यांचे उलट दिशेने पाण्याचा फुगवटा, आरोग्य आणि वैद्यकीय विभागाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या डेंग्यू, मलेरिया,चिकणगुणिया यासारखे साथीचे आजार, सर्प दंश उपाययोजना, पुरेसा औषध साठा, कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया यासंदर्भात नागरिकांना स्वतंत्रपणे मार्गदर्शक माहिती उपलब्ध करून द्यावी असे आवाहन केले.

असे आहेत दिलेले निर्देश

ग्रामीण भागात बुजवले गेलेले पाण्याचे चर पुर्ववत करणे, बांधकाम विभागाने तालुक्यातील जेथे कच्चे रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचून वाहतूकीला अडथळे तयार होतात तेथे तातडीने व्यवस्था करुन वाहतूक पुर्ववत करावी. आपत्तीग्रस्तांची व्यवस्था, शहरी भागात नाले सफाई, धोकादायक इमारत मालकांना सूचना देणे, शहरात नियमित औषधांची फवारणी करणे पोलीस विभागाने पूर काळात कायदा व सुव्यवस्था तसेच नदीकाठावर आणि पुलावर नागरिक येणार नाही याची काळजी घ्यावी, वीज वितरण विभागाने वीजेच्या तारा तुटून वीज पुरवठा खंडित होण्यासाठी कारणीभूत झाडाच्या फांद्या तोडाव्या, शासकीय कार्यालयातील दूरध्वनी २४ तास कार्यान्वित ठेवणे, वीज पुरवठा खंडित काळात नागरिकांना संवाद साधण्यासाठी अतिरिक्त मोबाईल नंबर सेवा उपलब्ध करुन देणे, वीज पुरवठा खंडित होण्याची कारणे आणि तो सुरळीत होण्याची वेळ नागरिकांना तातडीने कळविण्यातची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी कोपरगाव तालुक्यातील सर्व गावांना पावसाळयातील संभाव्य पूर परिस्थिती, ढगफुटी आणि त्यामुळे होणाऱ्या बाधित कुटुंबियांचे व्यवस्थापन याबद्दल ग्रामस्तरावर उपाययोजना करण्यात आल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी व तालुका दंडाधिकारी यांच्या सुचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. कोपरगाव नगरपरिषदचे फायर ब्रिगेड अधिकारी संभाजी कार्ले यांनी आपत्ती निर्मूलनासाठी नगरपालिकेने केलेली शहर नियोजनाची माहिती सादर केली.

सर्व घटकांचे मानले आभार

या प्रसंगी विविध खात्यांचे अधिकारी यांनी आपत्कालीन परिस्थिती संदर्भात केलेल्या नियोजनाची माहिती सादर केली. कोरोना संकटात नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल प्रशासनाने सर्व घटकांचे आभार मानले. यापुढे संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या निर्मूलनासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details