अहमदनगर -राहुरी येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांच्या हत्याप्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. ही हत्या भूखंड प्रकरणातून झाली असून, तो भूखंड ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कंपनीशी संबंधित असल्याचा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांनी केला होता. त्यांनी याबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन देखील दिले होते. मात्र तनपुरे यांनी कर्डिले यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. सोहम प्रॉपर्टी बरोबर दातीर यांचा कोणताही वाद नसल्याचे तनपुरे यांनी म्हटले आहे. तसेच कर्डिले यांच्याकडे जर पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांकडे सादर करावे असं देखील प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले आहे.
6 एप्रिल रोजी राहुरी शहरातील मल्हारवाडी रोडवरून पत्रकार दातीर यांचं अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. दरम्यान रोहिदास दातीर यांच्या पत्निने संशयीत आरोपी म्हणून कान्हु मोरे याचे नाव घेतले होते. पोलिसांनी कान्हु मोरे याचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. या प्रकरणात अन्य दोन आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. मात्र अद्यापही कान्हु मोरेला अटक करण्यात आलेली नाही. कान्हु मोरेने यापूर्वी देखील दातीर यांना धमकावले होते. तर रोहीदास दातीर यांना प्राजक्त तनपुरे यांच्या वाड्यावरही बोलवण्यात आले होते. 18 एकर जमिनीच्या प्रकरणात मोरे हा दातीर यांच्यावर राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता, असा आरोप देखील दातीर यांच्या पत्नी सविता यांनी केला आहे.
प्राजक्त तनपुरेंनी फेटाळले कर्डिलेंचे आरोप काय म्हटले आहे शिवाजी कर्डिले यांनी?
पत्रकार रोहिदास दातीर यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. पोलिसांचा तपास सुरू असतानाच राहुरीचे माजी आमदार कर्डिले यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी खळबळजनक आरोप केले. ‘पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येची आम्ही इत्यंभूत माहिती घेतली आहे. यात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी पोलिसांना माहिती दिली आहे की, राहुरीतील १८ एकर भूखंडाच्या मालकीसंबंधी दातीर सतत तक्रार अर्ज करून, अडचणी वाढवत असल्याने त्यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे आम्ही या भूखंडाची माहिती मिळविली तेव्हा कळले की, हा भूखंड पठारे नावाच्या एका शेतकऱ्याच्या नावावर आहे. मात्र नगरपालिकेने तेथे आरक्षण टाकले होते. नंतर हे आरक्षण उठविण्यात आले. त्या जागेत आता सोहम ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. आम्ही याबाबत माहिती घेतली तर असे कळून आले की, ही कंपनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर आहे. या कंपनीत तनपुरे यांचे मेहुणे देशमुख आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे हे भागिदार आहेत. दातीर यांना पठारे कुटुंबियांनी मुखत्यारपत्र दिले होते. त्या आधारे दातीर या भूखंडासाठी कायदेशीर लढाई लढत होते. यावरून त्यांना मोरे यांच्याकडून अनेकदा धमक्या आल्या होत्या. दातीर यांच्या पत्नीने पोलिसांत तशी तक्रारही दिली होती. मोरे याच्या विरुद्ध दातीर यांनीही अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र, पोलिसांनी कारवाई केली नाही. दातीर यांना संरक्षणही दिले नाही, असा आरोप कर्डिले यांनी केला आहे. दातीर यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना अटक करण्यात यावी आणि दातीर यांच्या पत्नीला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी करतानाच 15 दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही कर्डीले यांनी दिला आहे.
प्राजक्त तनपुरे यांच्याकडून आरोपांचे खंडण
मात्र या आरोपांना उत्तर देतांना प्राजक्त तनपुरे यांनी कर्डीलेंनी ज्या भूखंडाचा उल्लेख केला आहे, ती जागा बाबुराव तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेने १९९२ मध्येच खरेदी केली आहे. सोहम प्रॉपर्टीज ही फर्म माझ्या मेहुण्याच्या नावे आहे. माझा मुलगा सोहम १४ वर्षांचा असून त्याचा संस्थेशी संबध नाही. मुख्य म्हणजे पत्रकार रोहिदास दातीर व या फर्मचा कोणताही वाद नव्हता. शिवाजी कर्डिले यांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.