महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 9:51 PM IST

ETV Bharat / state

अंगणवाडी सेविकांच्या पगारवाढीसाठी पैसे नसणं महाराष्ट्राचं दुर्दैव - सुळे

अंगणवाडी सेविकांच्या पगारवाढीसाठी पैसे नसणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसंच भाजपा भ्रष्ट, जुमलेबाजीचा पक्ष झाल्याचं सुळे यांनी म्हटलंय.

Supriya Sule
खासदार सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया

शिर्डी :ED, CBI मार्फत लोकांची घरं फोडण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी, मतं मिळवण्यासाठी भाजपा सरकारकडं पैसा आहे. पण, अंगणवाडी सेविकांच्या पगारवाढीसाठी पैसा नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. त्या आज शिर्डीत बोलत होत्या. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू असल्याची टीका देखील केलीय.


महायुती सरकार अत्यंत असंवेदनशील :अहमदनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी आज शिर्डीत सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासमोर अंगणवाडी सेविकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. अंगणवाडी सेविका गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या हक्कासाठी लढा देत आहेत. मात्र, या अंगणवाडी सेविकांना सरकारनं पगारवाढ दिली नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. यावरून राज्यातील महायुती सरकार अत्यंत असंवेदनशील असल्याचं दिसून येतं, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.

अन्यथा माफी मागा : एकेकाळी भारतीय जनता पक्ष होता. मात्र, आता भाजपा भ्रष्ट, जुमलेबाजीचा पक्ष झाल्याची टीका सुळे यांनी केली आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्ट जुमलेबाज पक्षानं आरोप केले होते. ईडी, सीबीआयनं त्यांची चौकशी केली. पण, मुश्रीफ यांच्या पत्नीनं ईडी, सीबीआय विरोधात लढा दिला. त्यांचा आम्हाला अभिमान आहे. पण, आज मुश्रीफ भाजपा सरकारमध्ये आहेत. याच भाजपाचे समरजित घाडगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळं मुश्रीफ यांच्यावरील आरोप, खरे की खोटे हे जुमला पक्षानं सांगायला हवं. मात्र, आरोप खोटे असल्यास समरजित घाडगेसह भ्रष्ट, जुमलेबाज पक्षानं राष्ट्रवादीची माफी मागावी, अशी मागणी देखील सुळे यांनी केलीय.




श्रीरामचंद्र प्रत्येकाच्या हृदयात :राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात बोलताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, भगवान श्रीरामचंद्र संपूर्ण देशाचे आहेत. देशातील प्रत्येकाच्या हृदयात राम आहे. मात्र, भाजपा प्रभू श्रीरामाच्या नावानं राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. हे, प्रत्येक राम भक्तासाठी वेदनादायी आहे. भगवान श्रीरामचंद्र सर्वांच्या मनात आहेत. प्रत्येकाची राजकीय विचारसरणी वेगळी असली, तरी प्रत्येकाच्या हृदयात राम आहे. त्यामुळं या कार्यक्रमाला कोणताही राजकीय रंग देऊ नये, असं कोल्हे यांनी म्हटलंय.

बेरोजगारी प्रश्नांवर भाजपाचे मौन : भारतीय जनता पक्षानं कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याची गरज आहे. बेरोजगारी, महागाई या प्रश्नांवर भाजपाला ठोस उत्तरे देता आलेली नाहीत. सर्वसामान्य महिला, तरुणांमध्ये रोष, नाराजी आहे. त्यामुळं राजकीय भूमिका असणं स्वाभाविक आहे. गुजरात, महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य का हिसकावून घेत आहे, असा सवाल केंद्र सरकारला विचारण्याची ताकद महाराष्ट्र सरकारमध्ये नाही, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.



हेही वाचा -

  1. खोके सरकारला अंगणवाडी सेविकांना देण्यासाठी काही नाही - उद्धव ठाकरे
  2. पीएपी घोटाळ्यात पवार कुटुंबीयांचा सहभाग; किरीट सोमैया यांचा गंभीर आरोप
  3. राजाराम साखर कारखान्याच्या एमडीला मारहाण केल्याप्रकरणी 13 जणांविरुद्ध गुन्हा

ABOUT THE AUTHOR

...view details