अहमदनगर - पंकजा मुंडे यांनी इतर कुणाची भाषा बोलण्याऐवजी कामगारांसाठीची भाषा बोलावी, असा सल्ला अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे. ऊसतोड कामगार प्रश्नी वंचित बहुजन आघाडीतर्फे भगवानबाबा गडाच्या पायथ्याशी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हा सल्ला देत आंबेडकर यांनी ऊसतोड कामगारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला.
साखर कारखानदारी आणि त्याला निगडित असलेला ऊसतोडणी कामगार, ऊस वाहतूकदार आणि कामगार टोळ्यांचे आर्थिक व्यवहार पाहणारा मुकादम या तिन्ही घटकांना हात घालत आंबेडकर यांनी त्यांच्या प्रश्नांची यादी वाचली. तिन्ही घटकांनी एकत्र येत न्यायहक्कासाठी लढण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.