अहमदनगर - 'कोपर्डी' हा शब्द उच्चारला तरी अंगावर शहारे येतात. अहमदनगर जिल्ह्याच्या एका खेडेगावात काही नराधमांनी क्रौर्याच्या सीमा ओलांडत चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती. ही घटना होऊन काल चार वर्ष पूर्ण झाली. या प्रकरणातल्या तीनही आरोपींना 29 नोव्हेंबर 2017ला अहमदनगरच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. मात्र, आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केल्याने या शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही.
आजही निर्भयाच्या आठवणीने पाणावतात डोळे -
चार वर्षे झाली आमच्या मुलगी आम्हाला सोडून गेली. मात्र, आजही आमचा दिवस तिच्याच आठवणीने उगवतो आणि मावळतो. घटना होऊन इतकी वर्ष झाली अजूनही आमच्या काळजाच्या तुकड्याला न्याय मिळाला नाही. तिच्या मारेकऱ्यांना फासावर लटकल्यावरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल, असा आक्रोश निर्भयाचे आई, वडील आणि लहान बहिणी करत आहेत.
13 जुलै 2016 रोजी काळजाचा ठोका चुकेल असे क्रौर्य कोपर्डी येथे घडले होते. त्या दिवसापासून आजपर्यंत न चुकता तिचे आई-वडिल न चुकता तिच्या स्मृती स्थळावर नंदादीप लावतात. दररोज केलेल्या भाजी-भाकरीचा नैवेद्य तिथे नेऊन ठेवतात मगच त्यांच्या गळ्याखाली घास जातो. काल निर्भयाला कुटुंबीयांनी श्रद्धांजली वाहिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन टाळण्यात आले.