अहमदनगर- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. या विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठीचे प्रयत्न जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून अधिक गतिमान करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे. अधिकाधिक चाचण्या करून बाधितांना लवकर शोधण्यासाठी प्रयत्न होत असून त्याचाच भाग म्हणून जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबची क्षमता आता प्रतिदिन एक हजार चाचण्या एवढी करण्यात आली असल्याचे द्विवेदी यांनी दिली.
कोरोना चाचणी संख्या वाढविण्यात आल्याने आता ज्यांना कोरोनाच लक्षणे असतील, तसेच बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील असतील अथवा इतर गंभीर आजारांनी त्रस्त असतील अशा व्यक्ती त्यांचे घशातील स्त्राव जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी देऊ शकणार आहेत. अशा व्यक्तींनी त्यांचे स्त्राव तपासणी येथे करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सध्या जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने 'चेस द व्हायरस' हे लक्ष्य ठेऊन रुग्णांपर्यंत पोहोचण्याची मोहीम आखली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात आरोग्य यंत्रणा आणि सर्व तालुकास्तरीय यंत्रणांना निर्देश दिले आहेत. रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या माध्यमातून ही मोहीम गतिमान झाली आहे. आता जिल्हा रुग्णालयातील लॅबची क्षमता वाढल्याने प्रादुर्भाव रोखण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना अधिक गती मिळणार आहे.