महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बंडखोर नेत्यांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला अहमदनगरमध्ये फटका बसण्याची शक्यता

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बडे नेते भाजप सेनेच्या वाटेवर असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय. संग्राम जगताप आणि राहुल जगताप हे नेते देखील भाजपच्या वाटेवर आहेत.

By

Published : Jul 27, 2019, 9:03 PM IST

शरद पवार बाळासाहेब थोरात

अहमदनगर- काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील बडे नेते, पदाधिकारी आणि आमदार एकापाठोपाठ भाजप-सेनेचा रस्ता धरत असल्याने आघाडीवर मोठी नामुष्कीची वेळ आली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांचा धाक कमी झाल्यासारखी परिस्थिती आहे. काँग्रेस पक्ष पुरता घायाळ झाला असल्याचे दिसते.

काँग्रेस राष्ट्रवादीला बंडखाेर नेत्यांमुळे फटका बसण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीच्या वेळी अहमदनगर जिल्ह्यात सुजय विखे यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने विखे-पवार संघर्ष झाला होता. राधाकृष्ण विखे यांच्या भाजप प्रवेशामुळे आघाडीला मोठा धक्का बसला होता. पण या पाठोपाठ आघाडीचे अनेक मोठे नेते सेना-भाजपवासी झाले आहेत. अजूनही अनेकांची नावे पुढे येतच आहेत. जिल्ह्यात या बंडखोरीची सुरुवात काँग्रेस पासून झाली ती आता राष्ट्रवादीच्या उंबरठ्यावर येऊन पोहचली आहे.

राष्ट्रवादीचे तीनही आमदार भाजपच्या संपर्कात !!
शरद पवार यांच्या सोबत नेहमी सावलीसारखे सोबत राहिलेले राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मधुकर पिचड यांचे पुत्र आणि अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांचा भाजप प्रवेश आता निश्चित झाला आहे. अकोले तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी आपले पक्षाच्या पदाचे आणि प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे जिल्हाध्यक्षांना पाठवून दिले आहेत. दिलीप वळसे-पाटलांनी व्यक्त केलेला विश्वास दुसऱ्याच दिवशी वैभव पिचड यांनी फोल ठरवला आहे.

अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप आणि श्रीगोंदयाचे आमदार राहुल जगताप यांच्याही भाजप प्रवेशाबाबत चाचपण्या सुरू असल्याची माहिती आहे. पण नगरची जागा शिवसेनेकडे असल्याने आणि सेनेचे उपनेते अनिल राठोड हे इथून मोठे दावेदार असल्याने तसेच श्रीगोंदयात पण बबनराव पाचपुते हे भाजपकडून मोठे दावेदार असल्याने भाजपचे वरिष्ठ काय निर्णय घेतात यावरच या दोघांचा भाजप प्रवेश अवलंबून आहे. मात्र, संग्राम यांचे सासरे आमदार शिवाजी कर्डीले जावयासाठी काही नवीन प्रयोग करतात का यावरही बरेच काही अवलंबून आहे.

विखेंच्या भाजपात जाण्याने काँग्रेस घायाळ !!
जिल्ह्यात दक्षिण भागातच काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहेत. विखे, थोरात आणि कांबळे हे काँग्रेसचे तीन आमदार होते. यांच्यापैकी लोकसभा उमेदवारीवरून पेटलेल्या रणकंदनात विखे परिवार भाजपमध्ये गेला. श्रीरामपूर राखीव विधानसभा मतदार संघात विखे आणि ससाणे यांचा आशीर्वाद असल्याशिवाय निवडून येणे अशक्य समजले जाते. त्यामुळे संगमनेरच्या बाळासाहेब थोरात यांच्या जागेशिवाय दुसरीकडे कुठे काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल, असे म्हणणे धाडसाचे ठरणार आहे. उलटपक्षी थोरातांना चहुबाजूंनी घेरण्याची जोरदार तयारी विखे यांच्या यंत्रणेने केली असून संगमनेर मध्ये काही धक्कादायक निकाल लागतो का याची उत्सुकता राजकीय विश्लेषकांमध्ये दिसून येत आहे.

दक्षिण नगर जिल्ह्यात काँग्रेसची मोठी वाताहत आहे. राज्यातच काय जिल्ह्यात प्रभावी असलेले एकही नाव दक्षिण नगर जिल्ह्यात आजमितीला काँग्रेस पक्षाकडे नाही. त्यामुळे एकूणच जिल्ह्यात भाजप-सेनेचा बोलबाला राहणार आहे. रोहित पवार यांच्या निमित्ताने कर्जत-जामखेडमध्ये रंगत आणली जात असली तरी उर्वरित नगर जिल्ह्यात आघाडीला विजयासाठी सर्वत्र खूप झगडावे लागणार आहे. थोरात-विखे यापैकी कोण कोणावर भारी पडणार, हे निकालानंतर निश्चितच कळणार असले तरी कांग्रेस-राष्ट्रवादीची होणारी मोठी पडझड ही संभाव्य निकालाची नांदी ठरु शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details