नवी दिल्ली- भारतीय रायफल संघटनेने (एनआरएआय) क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी दिग्गज नेमबाज अंजूम मौदगिल हिच्या नावाची शिफारस केली आहे. तर सलग दुसऱ्या वर्षी जसपाल राणा यांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
अंजून, जसपाल यांच्याशिवाय एनआरएआयकडून सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा, मनू भाकर आणि इलाव्हेनिल व्हॅलारिव्हान यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
अंजूमने २००८ साली नेमबाजी सुरू केली. चंदीगडच्या २६ वर्षीय अंजूमने दहा मीटर एअर रायफल प्रकारात विश्वचषकात रौप्य जिंकून टोकियो ऑलिम्पिकची पात्रता गाठली आहे. मागील वर्षी अंजूम आणि दिव्यांश पवार यांनी म्युनिच आणि बीजिंगमध्ये विश्वचषकात मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण जिंकले होते.