कोलंबो :शेवट्पर्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं पाकिस्तानवर 2 विकेट राखून विजय मिळवलाय. पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत आता आशिया कपमधून बाहेर पडावं लागतंय. आता श्रीलंकेचा अंतिम मुकाबला हा भारतासोबत होणार आहे. सुपर फोरमधला हा चौथा सामना होता. भारतानं पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव करुन आधीच अंतिम फेरीत प्रवेश केलाय. टीम इंडिया 11 व्यांदा आशिया कप क्रिकेटच्या अंतिम सामन्यात पोहोचली आहे.
पाकिस्तानची दमदार खेळी : पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका आशिया कप 2023 सुपर 4 मधील 5 वा सामना आज कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला. आशिया चषक 2023 सुपर 4 सामन्यात श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं 42 षटकात 7 गडी गमावून 252 धावा केल्या. पावसामुळे सामना सुरुवातीला 45-45 षटकांचा होता, पण नंतर पावसाच्या व्यत्ययामुळं तो 42-42 षटकांचा करण्यात आला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवाननं नाबाद 86, अब्दुल्ला शफीकनं 52 तर इफ्तिखार अहमदनं 47 धावा केल्या. श्रीलंकेतर्फे मथिसा पाथिरानानं तीन, तर प्रमोद मदुसननं दोन गडी बाद केले.
28 व्या षटकात पावसाची हजेरी : प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. 5 व्या षटकात फखर जामाच्या रूपानं संघानं पहिली विकेट गमावली. यानंतर बाबर आणि शफिक यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. बाबर 29 धावा करून बाद झाला तर, अब्दुल्ला 52 धावा करून बाद झाला. मोहम्मद हारिस (3) आणि नवाज (12) धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. सामना संपल्यानंतर पाकिस्तानचा संघ एकवेळ संघर्ष करताना 27.4 षटकांत 130 धावांवर 5 गडी गमावले. 28व्या षटकात पावसानं हजेरी लावली. त्यानंतर रिझवान आणि इफ्तिखार यांच्या शतकी भागीदारीमुळं पाकिस्तान संघानं उर्वरित 14.2 षटकांत दोन गडी गमावून 130 धावा केल्या.
फायनलमध्ये भारत-पाकिस्तान सामना नाही : आशिया कपमधून पाकिस्तान संघ बाहेर पडलाय. त्यामुळं पाकिस्तानचा मुकाबला आता भारतासोबत होणार नाही. आतापर्यंत एकदाही आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारत पाकिस्तान आमनेसामने आले नाहीय. यावेळेस तरी भारत पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होईल अशी आशा क्रिकेटप्रेमींना होती.