पोचेफस्ट्रूम : पहिला अंडर-19 महिला टी20 विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत खेळला जात आहे. दोन आठवड्यांच्या रोमांचक सामन्यांनंतर भारत अंतिम फेरीत पोहोचला आहे. रविवारी (२९ जानेवारी) विजेतेपदाच्या लढतीत भारतीय संघाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. रविवारी पॉचेफस्ट्रुम येथील जेबी मार्क्स ओव्हल येथे हा सामना रंगणार आहे. रविवारी भारताकडे महिला क्रिकेटच्या इतिहासातील पहिली विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.
भारत इतिहास घडवू शकतो :भारतीय अंडर-19 महिला संघासाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. आज शेफाली वर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडे इतिहास रचण्याची आणि देशासाठी पहिला विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. कर्णधार शेफाली वर्मा रविवारी पॉचेफस्ट्रूम येथे प्रथमच आयसीसी अंडर 19 महिला टी20 विश्वचषक फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचे नेतृत्व करणार आहे. सुपर सिक्समध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव वगळता इंग्लंडने अद्याप एकही सामना गमावलेला नाही. त्यांनी दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर तीन धावांनी केलेल्या अविश्वसनीय विजय मिळवला होता. या विजयाने इंग्लंड संघाने दाखवून दिले की ते मैदानावरील खडतर परिस्थितीतही दबाव हाताळू शकतात आणि संयम राखू शकतात.
दोन्ही संघांकडे दर्जेदार खेळाडू : भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांकडे उपकर्णधार श्वेता सेहरावत आणि कर्णधार ग्रेस स्क्रिव्हन्सच्या रूपाने मजबूत सलामीवीर आहेत. श्वेता फलंदाजांमध्ये भारताची मुख्य आधारस्तंभ आहे. तिने आपल्या स्ट्रोक प्लेने सर्वांना प्रभावित केले आहे. तिने या विश्वचषकात 115.50 च्या सरासरीने 231 धावा केल्या आहेत आणि ती स्पर्धेत फक्त दोनदा बाद झाली आहे. दुसरीकडे ग्रेसने बॅटिंगमध्ये सातत्य राखले आहे. ती 53.80 च्या सरासरीने 269 धावा करत स्पर्धेत सर्वाधिक धावा करणऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. तसेच तिने तिच्या ऑफ स्पिनच्या बळावर 7.16 च्या इकॉनॉमीने 6 विकेट्स घेतल्या आहेत. पार्श्वी चोप्रा आणि हॅना बेकर यांच्या रूपाने भारत आणि इंग्लंडकडे दर्जेदार लेगस्पिनर आहेत जे फलंदाजांना ब्रेक लावू शकतात.