ब्रिस्टल- स्नेह राणाची अष्टपैलू कामगिरी आणि शफाली वर्माच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी अनिर्णित राखण्यात यशस्वी ठरला. स्नेह राणाच्या नाबाद अर्धशतकाच्या खेळीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने शनिवारी इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी अनिर्णित राखली. राणाने (१५४ चेंडूंत १३ चौकारांसह नाबाद ८० धावा) तानिया भाटियाच्या साथीने नवव्या विकेटसाठी १०४ धावांची अप्रतिम खेळी केली. त्यामुळे भारताला दुसऱ्या डावात १२१ षटकांत ८ बाद ३४४ धावा करण्यात यश मिळाले. भाटियाने नाबाद ४४ धावा केल्या. त्याआधी सलग दुसरे अर्धशतक झळकावणारी शफाली वर्मा ६३ धावांवर बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजी डगमगू लागली होती. दीप्तीने पूनम राऊतसह (३९ धावा) तिसऱ्या विकेटसाठी जोडल्या व ७२ धावांची भागीदारी केली. पण सोफी एस्सेलस्टोनने दीप्तीचे (५४ धावांवर ) आव्हाण संपुष्टात आणले. कर्णधार मिताली राज (४) आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर (८) धावांवर बाद झाल्याने त्यांनी निराशा केली.
भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी अनिर्णित राखली
स्नेह राणा
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने ९ बाद ३९६ धावांवर आपला डाव घोषित केला. इंग्लंड संघाला प्रतिउत्तर देताना भारतीय संघ पहिल्या डावात २३१ धावांवर बाद झाला. इंग्लंडने भारताला फॉलोऑन दिला. त्यानंतर अखेरच्या दिवशी दुसर्या डावात ८ बाद ३४४ धावा करुन भारताने सामना वाचवला. दोन्ही डावात अर्धशतके ठोकणाऱ्या शेफालीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.