मुंबई - कोलकाता नाईट रायडर्सची सलामी जोडी शुबमन गिल आणि नितीश राणा संघाला चांगली सुरूवात करून देण्यात अपयशी ठरत आहेत. याचा फटका केकेआरला बसत आहे. या विषयावरून भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनिल गावस्कर यांनी केकेआरला सल्ला दिला आहे. त्यांनी, सलामी जोडी बदलण्याचा सल्ला दिला आहे.
गावस्कर यांनी एका क्रीडा वाहिनीशी बोलताना सांगितलं की, नितिश राणा तिसऱ्या नंबरवर फलंदाजी करताना यशस्वी ठरला आहे. यामुळे राहुल त्रिपाठी सलामीला येऊ शकतो. याआधी त्रिपाठीने दुसऱ्या संघाकडून खेळताना ही भूमिका पार पाडली आहे. या बदलामुळे केकेआरसाठी मार्ग तयार होईल. सुनिल नरेन सलामीवीर म्हणून शुबमन गिल किंवा राहुल त्रिपाठी सोबत जाऊ शकतो. ही मानसिकता केकेआरला ठेवण्याची गरज आहे. गिल देखील धावा काढण्यासाठी संघर्ष करत आहे. कदाचित त्रिपाठी सलामीवीर म्हणून नरेनसोबत खेळेल. अशी स्थिती निर्माण होऊ शकते.
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात केकेआरने विजय मिळवला. यात कर्णधार इयॉन मॉर्गन याने दमदार खेळी केली. या विषयावरून गावस्कर म्हणाले, मॉर्गनने चांगले फटके मारले. त्याने आपल्या नैसर्गिक खेळावर भर देत आक्रमक फलंदाजी केली. यामुळे पुढील सामन्यात त्याचा निश्वितपणे आत्मविश्वास वाढेल.