लखनऊ -भारत आणि श्रीलंका (IND Vs SL 1st T-20) यांच्यातील तीन T-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारताने श्रीलंकेला ६२ धावांनी मात देत मालिकेत १-० अशी विजयी आघाडी घेतली. श्रीलंकेचा कप्तान दासून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाज इशान किशन (८९) आणि श्रेयस अय्यर (५७) यांच्या वादळी खेळींमुळे भारताने २० षटकात २ बाद १९९ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या चरिथ असलांकाशिवाय (नाबाद ५३) इतर खेळाडू धावा जमवण्यात अपयशी ठरले. त्यांना २० षटकात ६ बाद १३७ धावांपर्यंत पोहोचता आले.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित सर्वाधिक धावा करणारा फलंदाज -
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी सध्या क्रिकेटच्या मैदानावर सगळे काही मनासारखे घडत आहे. तिन्ही फॉर्मेटमध्ये भारताचे कर्णधारपद त्याला मिळाले आहे. वनडे आणि टी 20 मध्ये भारताला सातत्याने विजय मिळत आहे. त्याशिवाय रोहित आपल्या बॅटनेही कमाल दाखवत आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.
दीपक हुडाचे टी20 पदार्पण
वेस्ट इंडीजविरोधात एकदिवसीय सामन्यातून क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या दीपक हुडाचे आज टी-20 पदार्पण झाले आहे. दीपक हुडाने कॅरेबियन संघाविरुद्धच्या दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाजीच्या जोरावर महत्त्वपूर्ण धावा केल्या होत्या. तर, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी करताना त्याने पहिली आंतरराष्ट्रीय विकेटही घेतली होती.