हैदराबादIND vs AFG T20 Series : दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर आता टीम इंडियाला मायदेशात अफगाणिस्तानविरुद्ध 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळायची आहे. जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी भारताची ही एकमेव टी 20 मालिका असेल. त्यानंतर आयपीएल सुरू होईल. त्यामुळे संघ निवडीच्या दृष्टिकोनातून ही मालिका खूप महत्त्वाची आहे.
आयपीएलमध्ये परतण्याची अपेक्षा : रिपोर्टनुसार, टीम इंडियाचे स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या अफगाणिस्तानविरुद्ध 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग असणार नाहीत. मात्र सूर्यकुमार आणि हार्दिक दोघंही आयपीएलमध्ये परतण्याची अपेक्षा आहे. डिसेंबरमध्ये जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सूर्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्याच्या घोट्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली.
हार्दिकचं पुनर्वसन सुरू : पुण्यात बांगलादेश विरुद्धच्या विश्वचषक साखळी सामन्यात लिगामेंटच्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्या संपूर्ण विश्वचषकातून बाहेर पडला होता. हार्दिकचं पुनर्वसन सुरू आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मधील वैद्यकीय कर्मचार्यांनी तो लवकरच बरा होण्याचा अंदाज वर्तवलाय. खबरदारी म्हणून वैद्यकीय पथकानं हार्दिकला कामाचा ताण कमी करण्याचा सल्ला दिला आहे.
रोहित-विराट संघात परततील का : अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचाही समावेश होण्याबाबत शंका आहे. टी 20 विश्वचषक 2022 मधील उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर रोहित आणि कोहली यांनी एकही टी 20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तसेच सलामीवीर ऋतुराज गायकवाड देखील बोटाला झालेल्या दुखापतीमुळे उपलब्ध नाही. तो इंग्लंडविरुद्धच्या आगामी मायदेशातील कसोटी मालिकेला देखील मुकण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का :
- राजकारण नको रे बाबा! अंबाती रायुडूनं आठवडाभरातच सोडला 'हा' पक्ष
- टी 20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान सामना कधी होणार; जाणून घ्या
- धोनीला जिगरी दोस्तानेच लावला चुना, तब्बल 15 कोटींची फसवणूक!