महाराष्ट्र

maharashtra

Prasidh Krishna : प्रसिद्ध कृष्णा लहानपणापासूनचं आहे प्रतिभावान गोलंदाज, विश्वचषकात निवड होणं अभिमानास्पद

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 10:31 PM IST

Prasidh Krishna : अष्टपैलू हार्दिक पंड्या चालू विश्वचषकातून बाहेर पडला असून त्याच्या जागी कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाची निवड करण्यात आली आहे. 'ईटीव्ही भारत'चे कुमार सुब्रमण्यम यांनी, प्रसिद्ध कृष्णा जिथे खेळून मोठा झाला त्या माउंट जॉय क्रिकेट क्लबचे सेक्रेटरी बीके रवी यांच्याशी खास बातचीत केली.

Prasidh Krishna
Prasidh Krishna

हैदराबाद Prasidh Krishna : टीम इंडियासाठी खेळण्याची संधी मिळणं ही कुठल्याही खेळाडूसाठी सन्मानाची गोष्ट असते. विशेषत: विश्वचषक संघात खेळणं आणि देशाचं प्रतिनिधित्व करणं ही अत्यंत अभिमानाची बाब. विश्वचषकाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर अष्टपैलू हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर त्याच्या जागी कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाची भारतीय संघात निवड करण्यात आली.

प्रसिद्ध सुरुवातीपासूनच प्रतिभावान गोलंदाज : बेंगळुरूच्या बसवानगुडी क्रिकेट अकादमी आणि माउंट जॉय क्रिकेट क्लबमध्ये खेळून मोठा झालेला प्रसिद्ध कृष्णा आता देशाचं प्रतिनिधित्व करत आहे. माऊंट जॉय क्रिकेट क्लबचे सचिव बीके रवी यांनी प्रसिद्धचा भारतीय संघात समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. प्रसिद्धनं सुरुवातीच्या काळात बसवानगुडी क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतलं. नंतर तो माउंट जॉय क्रिकेट क्लबकडून खेळला. तो सुरुवातीपासूनच प्रतिभावान गोलंदाज राहिला आहे. विश्वचषक संघात संधी मिळाल्यानं तो खूश होता.

विश्वचषक संघात शिकण्याच्या संधी मिळतात : बीके रवी यांनी 'ईटीव्ही भारत'शी खास बातचीत करताना सांगितलं की, 'त्याला संघात स्थान मिळेल यावर पूर्ण विश्वास होता. विश्वचषक संघात असताना शिकण्याच्या अधिक संधी मिळतात, असं ते म्हणाले. विश्वचषकात आतापर्यंत अपराजित राहिलेल्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचंही बीके रवी यांनी कौतुक केलं. 'टीम इंडिया चांगली कामगिरी करत आहे. गेल्या दहा वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ आम्ही संपवू असं वाटतं. आमच्या क्लबचा एक मुलगा इतक्या मोठ्या संघात खेळला हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे', असं ते म्हणाले.

सर्व विभागांमध्ये संघ मजबूत : टीम इंडियाच्या कामगिरीबद्दल बोलताना बीके रवी म्हणाले की, 'टीमनं सातत्यानं सामने जिंकले आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे अनुभवी फलंदाज म्हणून संघासाठी योगदान देत आहेत. याशिवाय केएल राहुल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांनीही महत्त्वाच्या वेळी चांगली कामगिरी केली. सर्व विभागांमध्ये संघ मजबूत दिसतोय. यावेळची कामगिरी बघितली तर आम्ही विश्वचषक जिंकू', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टीम इंडियाच्या गोलंदाजीत मोठा बदल : बीके रवी शेवटी म्हणाले की, 'संघातील मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह सारखे वेगवान गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजी करत आहेत. या आधी वेगवान गोलंदाजांची चर्चा व्हायची तेव्हा आपण वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचं कौतुक करायचो. मात्र आता टीम इंडियाच्या गोलंदाजीत मोठा बदल पाहायला मिळाला. प्रसिद्धही या तिघांप्रमाणे संघासाठी योगदान देऊ शकतो.

प्रसिद्ध कृष्णाची कारकीर्द : २७ वर्षीय प्रसिद्ध कृष्णानं २३ मार्च २०२१ रोजी इंग्लंडविरुद्ध वनडे पदार्पण केलं. तो भारताकडून १७ एकदिवसीय सामने खेळला आहे. यामध्ये त्यानं ५.६१ च्या इकॉनॉमीनं २९ विकेट घेतल्या आहेत. ४/१२ ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे.

हेही वाचा :

  1. Mohammed Shami : वडीलच होते पहिले प्रशिक्षक, शेतामध्ये शिकला स्विंग बॉलिंग; जाणून घ्या शमीचा आतापर्यंतचा प्रवास
  2. Virat Kohli : कोहलीचा 'विराट' पराक्रम, सचिनच्या ४९ शतकांची बरोबरी
  3. Shreyas Iyer Father Interview : श्रेयस अय्यरच्या वडिलांसोबत 'ईटीव्ही भारत'चा 'वन टू वन'; सांगितली अनेक गुपितं

ABOUT THE AUTHOR

...view details