लंडन - मागील काही सामन्यात भारताचे अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांच्या अपयशाची मालिका इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात देखील कायम राहिली. यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.
असे असले तरी भारतीय व्यवस्थापन आणि कर्णधार विराट कोहली, पुजारा आणि रहाणेच्या पाठिमागे खंबीर उभा आहे. आता यात आणखी एक खेळाडूची भर पडली आहे. पहिल्या डावात शतक ठोकणारा सलामीवीर केएल राहुलने देखील पुजारा आणि रहाणेची पाठराखण केली. तो म्हणाला की, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे विश्वस्तरावरील दिग्गज फलंदाज असून ते लवकरच वापसी करतील.
केएल राहुल लॉर्डस् कसोटी सामन्याचा दुसऱ्या दिवसांचा खेळ संपल्यानंतर माध्यमाशी बोलताना म्हणाला की, पुजारा आणि रहाणे या दोघांनी संघ अडचणीत असताना अनेक वेळा संघाला अडचणीतून बाहेर काढलं आहे. ते विश्वस्तरीय आणि अनुभवी खेळाडू आहेत. यामुळे त्यांना कल्पना आहे की दोन तीन डावातील अपयश कसे धुवून काढायचे.
तुम्हाला याची जाणीव असली पाहिजे की, ते कठिण परिस्थितीत खेळत आहेत. इंग्लंडमध्ये प्रतिकूल परिस्थितीत फलंदाजी करणे आव्हानात्मक आहे, असे देखील राहुल म्हणाला.