तिरुवनंतपुरम - टीम इंडियाचा फलंदाज संजू सॅमसन सध्या एका नव्या कारणाने चर्चेत आहे. ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या मैदानातील कर्मचाऱ्यांना सॅमसनने आपल्या सामन्याचे मानधन देऊ केले आहे.
भारत 'अ' आणि दक्षिण आफ्रिका 'अ' या संघांमधील पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका तिरुअनंतरपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय मैदानावर पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने दमदार प्रदर्शन करत ४-१ ने विजय प्राप्त केला. सामन्यादरम्यान सातत्याने येणाऱ्या पावसाच्या व्यत्ययामुळे मैदानातील कर्मचाऱ्यांनी खुप मेहनत घेतली.
हेही वाचा -आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत 'या' दोन संघाची झाली 'एन्ट्री'
सॅमसनने या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. तो म्हणाला, 'आम्ही व्यवस्थित खेळू शकलो कारण, मैदानातील कर्मचाऱ्यांनी खुप मेहनत घेतली. आपल्याला खरच त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे.' या मालिकेतील अखेरच्या सामन्यात सॅमसनने आक्रमक अर्धशतकी खेळी केली.
सॅमसनने ४८ चेंडूत ९१ धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या या योगदानामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. शेवटच्या दोन सामन्यांसाठी मिळालेले मानधन सॅमसनने मैदानातील कर्मचार्यांना दान केले. हे दोन सामने खेळण्यासाठी सॅमसनला दीड लाखांचे मानधन मिळाले होते.