महाराष्ट्र

maharashtra

IPL २०२० : मुंबई-दिल्ली अंतिम फेरी गाठण्यासाठी आज झुंजणार

By

Published : Nov 5, 2020, 5:09 PM IST

आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज पहिला क्वालिफायर सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुबईमध्ये खेळला जाणार आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने हा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.

ipl 2020 mi vs dc qualifier 1 match preview
IPL २०२० : मुंबई-दिल्ली अंतिम फेरी गाठण्यासाठी आज झुंजणार

दुबई - मुंबई इंडियन्सचा बलाढ्य संघ आणि आयपीएलच्या तेराव्या हंगामात शानदार कामगिरी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा संघ यांच्यात आज पहिल्या क्वालिफायरचा सामना रंगणार आहे. चार वेळचा विजेता मुंबईचा संघ संपूर्ण ताकदीनिशी आयपीएल पाचव्या विजेतेपदाच्या शर्यतीत आहे. तर दिल्लीचा संघ पहिल्या विजेतेपदासाठी अंतिम फेरी गाठण्यासाठी उत्सुक आहे.

मुंबई-दिल्ली अंतिम फेरी गाठण्यासाठी आज झुंजणार....

मुंबई-दिल्ली यांची कामगिरी -

मुंबईने १४ पैकी ९ सामने जिंकत १८ गुणांनिशी गुणतालिकेवर वर्चस्व गाजवले. मात्र अखेरच्या साखळी सामन्यात त्यांना हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला. यामुळे त्यांचा आत्मविश्वास काहीसा डळमळीत झाला आहे. दुसरीकडे दिल्लीने सलगच्या चार पराभवानंतर बंगळुरुला पराभूत करत आपली गाडी रुळावर आणली आहे. दिल्लीने १६ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे.

मुंबई तिन्ही आघाडीवर सक्षम -

मुंबईची सलामीची जोडी इशान किशन आणि क्विंटन डीकॉक चांगली सुरूवात करून देण्यात यशस्वी ठरत आहेत. तसेच मुंबईसाठी कर्णधार रोहित शर्माचे संघात पुनरागमन ही जमेची बाजू आहे. सूर्यकुमार यादवनेही महत्वाच्या क्षणी अप्रतिम खेळी करत मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिले आहेत. हाणामारीच्या षटकांमध्ये हार्दिक पांडय़ा, केरॉन पोलार्ड यांनीही चमक दाखवली आहे. मुंबईच्या वेगवान गोलंदाजीची प्रमुख भिस्त जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्यावर असून त्यांनीही आपापली जबाबदारी आतापर्यंत चोखपणे निभावली आहे. फिरकीपटू राहुल चहर त्यांना उत्तम साथ देत आहे.

दिल्लीची मदार धवनवर -

दुसरीकडे दिल्लीसाठी शिखर धवन फॉर्मात येणे आवश्यत आहे. मुंबईकर पृथ्वी शॉ दिल्लीसाठी फारसा फलदायी ठरला नाही. तसेच ऋषभ पंत याची कामगिरी दिल्लीसाठी चिंतेचा विषय आहे. शिवाय वेस्ट इंडिजच्या शिमरोन हेटमायर आणि मार्कस स्टॉयनिस हेसुद्धा भरीव योगदान देऊ शकले नाहीत. मुंबईकर अजिंक्य रहाणेला गवसलेला सूर दिल्लीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. रहाणेने बंगळूरुविरुद्ध ६० धावांची खेळी करत दिल्लीला विजय मिळवून दिला होता. त्याचबरोबर कर्णधार श्रेयस अय्यर आपल्यावरील जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे. गोलंदाजीत कॅगिसो रबाडा आणि एनरिक नॉर्किया या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल हे प्रतिस्पर्धी फलंदाजावर वर्चस्व गाजवण्यात काहीसे यशस्वी ठरले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details