दुबई -कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर 60 धावांनी मात केली. याबरोबरच कोलकाता प्ले-ऑफच्या शर्यतीत आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत. तसेच राजस्थानचा पराभव झाल्यामुळे राजस्थानचा संघ यंदाच्या आयपीएल टुर्नामेंटमधून बाहेर गेला आहे.
कर्णधार इयान मॉर्गनने केलेल्या भन्नाट खेळीमुळे कोलकाताने राजस्थानला १९२ धावांचे आव्हान दिले होते. त्याबदल्यात राजस्थानच्या संघ २० षटकांत ९ बाद १३१ धावा करू शकला. राजस्थानकडून फलंदाजी करताना जोस बटलरने 22 चेंडूंत १ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने सर्वाधिक ३५ धावा केल्या. राहुल तेवतियाने 27 चेंडूंत १ षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने ३१ धावा केल्या. तर त्यापाठोपाठ श्रेयस गोपाळ याने २३ चेंडूत नाबाद २३, बेन स्टोक्सने ११ चेंडूंत १८, जोफ्रा आर्चरने ६, स्टिव्ह स्मिथने ४, कार्तिक त्यागीने २, संजू सॅमननने १ धाव काढली. रियाग पराग शून्यावरच बाद झाला. त्याला कमिन्सने बाद केले. याप्रकारे राजस्थानचा संघ २० षटकांत ९ बाद १३१ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
कोलकाताकडून गोलंदाजी करताना पॅट कमिन्सने ४ षटकांत ३४ धावा देत ४ बळी टिपले. तर शिवम मावी आणि वरूण चक्रवर्तीने प्रत्येकी २ बळी घेतले. तसेच कमलेश नगरकोटीने एक बळी घेतला.
कर्णधार इयान मॉर्गनने केलेल्या भन्नाट खेळीमुळे कोलकाताने राजस्थानला १९२ धावांचे आव्हान दिले होते. राजस्थानचा फिरकीपटू राहुल तेवतियामुळे कोलकाताचा अर्धा संघ शंभर धावांच्या आत गारद झाला असताना मॉर्गनने संघाची कमान आपल्या हाती घेतली.
नाणेफेक जिंकून राजस्थानने प्रथम कोलकाताला फलंदाजीचे निमंत्रण दिले. नितीश राणा आणि शुबमन गिल सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात उतरले. मात्र, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने दुसऱ्याच चेंडूवर राणाचा काटा काढला. त्यानंत राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल यांनी डावाला आकार दिला. या दोघांनी ७२ धावांची भागिदारी रचली. शुबमनने ३६ धावांचे योगदान दिले. शुबमन आणि सुनील नरिनला राहुल तेवतियाने एकाच षटकात बाद केले. यानंतर राहुल त्रिपाठीही ३९ धावांवर माघारी परतला. यानंतर कर्णधार इयान मॉर्गनने संघाची सूत्रे सांभाळली. दुसऱ्या बाजूला आंद्रे रसेलने १० चेंडूत २५ धावा करत रंगत निर्माण केली. पण त्यागीने त्याला बाद केले. रसेल बाद झाल्यानंतर मॉर्गनने आक्रमक फटकेबाजी करत संघाची धावसंख्या दोनशेच्या जवळ पोहोचवली. मॉर्गनने ३५ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ६८ धावा केल्या. तर, तेवतियाने ४ षटकात २५ धावा देत सर्वाधिक ३ बळी बाद केले.