महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs NZ : न्यूझीलंडला 'व्हाईट वॉश', पाचव्या टी-२० सह भारताचा ५-० ने ऐतिहासिक मालिका विजय

भारताने अखेरच्या पाचव्या टी-२० सामन्यात ७ धावांनी विजय मिळवत न्यूझीलंड संघाला ५-० ने व्हाईटवॉश दिला.

By

Published : Feb 2, 2020, 4:09 PM IST

Updated : Feb 2, 2020, 4:53 PM IST

India vs New Zealand 5th T20 Live score: Taylor falls as NZ stumble again
IND vs NZ : न्यूझीलंडला 'व्हाईट वॉश', पाचव्या टी-२० सामन्यातही भारताची बाजी

माऊंट माउंगानुई - भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. भारताने अखेरच्या पाचव्या टी-२० सामन्यात ७ धावांनी विजय मिळवत न्यूझीलंड संघाला ५-० ने व्हाईटवॉश दिला. न्यूझीलंडच्या भूमीवर याआधी कोणत्याही संघाला द्विपक्षीय मालिकेत असा विजय मिळवता आलेला नाही

भारताच्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात चांगली झाली नाही. न्यूझीलंड पहिले तीन फलंदाज अवघ्या १७ धावांमध्ये परतले. पण त्यानंतर आपला शंभरावा सामना खेळणारा अनुभवी रॉस टेलर आणि टीम सेफर्ट यांनी दमदार फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. तेव्हा नवदीप सैनीने सेफर्टला माघारी धाडत न्यूझीलंडची जमलेली जोडी फोडली.

सेफर्ट अर्धशतक झळकावून माघारी परतला. त्यानंतर न्यूझीलंडच्या अखेरच्या फलंदाजांनी मैदानात फक्त हजेरी लावण्याचे काम केले. एका बाजूने गडी बाद होत असताना रॉस टेलरने एक बाजू पकडून धरत आपले व्यक्तिगत अर्धशतक झळकावले. भारताच्या विजयात टेलर आडकाठी घालणार असे दिसताच, सैनीने त्याला माघारी धाडले.

ईश सोढीने शार्दुल ठाकूरच्या अखेरच्या षटकात दोन षटकार खेचले पण तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. न्यूझीलंडला २० षटकात ९ बाद १५६ धावा करता आल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने ३, नवदीप सैनी-शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २-२ तर वॉशिंग्टन सुंदरने एक बळी घेतला.

विराट कोहलीला विश्रांती देत भारतीय संघ व्यवस्थापनाने रोहित शर्माकडे भारतीय संघाचे नेतृत्व दिले. तेव्हा रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र डावाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर म्हणून संधी मिळालेला युवा फलंदाज संजू सॅमसन पुन्हा एकदा अपयशी ठरला केवळ २ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर लोकेश राहुल यांनी भारताचा डाव सावरला.

रोहित-राहुल यांनी दुसऱ्या गड्यांसाठी ८८ धावांची भागीदारी केली. ही जोडी भारताला मोठी धावसंख्या उभारुन देणार असे वाटत असतानाच राहुल ४५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर भारताची धावगती मंदावली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी श्रेय्यस अय्यरला मोठे फटके खेळण्यापासून रोखले. तेव्हा एका बाजूने रोहितने अर्धशतक पूर्ण केले.

रोहित ६० धावांवर असताना पोटरीचे स्नायू दुखावल्याने त्याला मैदाना सोडावे लागले. रोहित गेल्यानंतर न्यूझीलंडने भारतीय फलंदाजांना वेसन घातले. शिवम दुबे (५) फटकेबाजी करण्याच्या नादात बाद झाल्यानंतर अखेरीस मनिष पांडे (११) आणि श्रेयस अय्यरने (३३) भारताला १६३ धावांपर्यंतचा पल्ला गाठून दिला. न्यूझीलंडकडून कुगलेजनने २ तर हमिश बेनेटने १ बळी घेतला.

सामन्यात ४ षटकात १२ धावा देत ३ गडी बाद करणारा जसप्रीत बुमराह सामनावीर ठरला. तर केएल राहुलला मालिकावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

Last Updated : Feb 2, 2020, 4:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details