नवी दिल्ली - वेस्ट इंडीज विरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने रविचंद्रन अश्विनच्या ठिकाणी रविंद्र जडेजाला अंतिम ११ मध्ये संधी दिली. कोहलीने दिलेल्या या संधीचे सोनेही जडेजाने केले. त्याने पहिल्या डावात अर्धशतक झळकावत भारताचा डाव सावरला. कोहलीचा हा निर्णय अनेक माजी खेळाडूंना रुचला नाही आणि त्यांनी कोहलीवर टीका केली. आता या विषयावर भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग यानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हरजभजन सिंग याने विराट कोहलीच्या या निर्णयाचे समर्थन केले. तो म्हणतो, 'अश्विन विदेशी खेळपट्ट्यावर उल्लेखनीय कामगिरी करण्यात यशस्वी ठरत नसल्याचे दिसून येत आहे. याचे उदाहरण सांगायचे झाल्यास २०१८ साली झालेल्या इंग्लंडविरुध्दचा सामना. साऊदॅम्टन येथे खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा गोलंदाज मोईन अलीने ९ गडी बाद केले. तर त्याच खेळपट्टीवर अश्विनला फक्त ३ गडी बाद करता आले. यामुळे आता पूर्वीसारखे प्रदर्शन अश्विनला करता येत नाही असे दिसत आहे.'