मुंबई- चेन्नई सुपर किंग्ज संघाचा महत्वाचा खेळाडू सुरेश रैनाने व्यक्तिगत कारण देत आयपीएलच्या १३ व्या हंगामातून माघार घेतली. महत्वाचे म्हणजे तो स्पर्धेसाठी दुबईमध्ये दाखल झाला होता. पण अचानक त्याने माघार घेत भारतात परण्याचा निर्णय घेतला. रैनाच्या या निर्णयावर अनेक चर्चा होत आहेत. अशात सीएसकेचे मालक एन. श्रीनिवासन यांनी रैनाबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे.
सुरेश रैनाच्या आयपीएल न खेळता भारतात परतण्याच्या निर्णयावर श्रीनिवासन म्हणाले, रैनाच्या डोक्यात यश गेले आहे. रैनाच्या आयपीएल सोडण्यावर अनेक चर्चा सुरू होत्या. त्यापैकी एक म्हणजे संघातील २ खेळाडूंसह १३ जणांना कोरोनाची लागण झाल्याने तो घाबरला होता. त्या कारणानेच त्याने संघ सोडण्याचा निर्णय घेतला. दुसरे कारण म्हणजे रैनाला हॉटेलमधील रूम खराब मिळाली होती.
आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात झालेली नाही. पण आम्हाला रैनाची कमी नक्कीच जाणवेल. तो परत यावा अशी इच्छा आहे. त्याला याची कल्पना नक्कीच असेल की तो ११ कोटी रुपये सोडून गेला आहे, असेही श्रीनिवासन यांनी सांगितलं.