महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'कोरोनाविरुद्धच्या लढ्यात निधी उभारण्यासाठी भारत-पाक मालिका खेळवा'

कोरोनाविरुद्ध लढ्यात निधी उभारण्यासाठी भारत-पाकिस्तान मालिका खेळवण्यात यावी, अशी मागणी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने केली आहे.

By

Published : Apr 9, 2020, 10:18 AM IST

Akhtar proposes Indo-Pak series to raise funds for fight against COVID-19
'कोरोनाविरुद्धच्या लढ्यात निधी उभारण्यासाठी भारत-पाक मालिका खेळवा'

मुंबई- सध्या कोरोनाने जगाला वेठीस धरले आहे. भारताचा पारंपरिक शेजारी पाकिस्तानातही कोरोनामुळे लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. प्रत्येक देश आपापल्या परीने यावर उपाययोजना करत आहे. या कामी सर्व स्तरातून मदतनिधीचा ओघ सुरू आहे. अशा परिस्थितीत कोरोनाविरुद्ध लढ्यात निधी उभारण्यासाठी भारत-पाकिस्तान मालिका खेळवण्यात यावी, असा प्रस्ताव पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने मांडला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्वंद्व जगजाहीर आहे. या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील क्रिकेट सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रीडाप्रेमी उत्सुक असतात. मैदानावरील दोन देशांमधील लढाई पाहण्यासाठी चाहत्यांच्या अक्षरश: उड्या पडतात. पण पाकिस्तानातून दहशतवादी कुरापतींना मिळणाऱ्या खतपाण्यामुळे भारताने शेजाऱ्यांशी सर्व संबंध तोडले आहेत. त्यामुळेच उभय देशांमध्ये तेरा वर्षांपासून द्विदेशीय क्रिकेट मालिका झालेली नाही. पण, आता कोरोनाच्या लढ्यात निधी उभारण्यासाठी शोएब अख्तरने भारत-पाकिस्तान यांच्यात ३ सामन्याची मालिका खेळवण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

शोएब अख्तरने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, 'कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हा काळ सर्वांसाठी खडतर आहे, अशा परिस्थितीत मी दोन्ही देशांमध्ये ३ सामन्यांची मालिका खेळवण्यात यावी, असा पर्याय सुचवतो.'

भारत-पाक सामन्यांचा निकाल काय लागेल याच्याकडे दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींनी गंभीरतेने पाहू नये. जर विराट कोहलीने शतक झळकावले तर त्याचा आनंद पाकिस्तानातील लोकांना झाला पाहिजे, बाबर आझमने शतक झळकावले तर भारतामधील चाहते खूश झाले पाहिजेत. १३ वर्षांच्या कालावधीनंतर दोन्ही संघ पहिल्यांदाच क्रिकेट मालिका खेळत असल्यामुळे, या मालिकेला चांगली टीआरपी मिळेल. यातून मिळणारे उत्पन्न दोन्ही देशांच्या सरकारने कोरोना लढ्यात वापरावा, असेही अख्तरने सांगितले.

लॉकडाऊनच्या काळात बहुतांश जनता घरात बसून आहे. त्यामुळे ही मालिका खेळवली गेल्यास याला सर्वोच्च प्रतिसाद मिळेल. सद्या ही वेळ मालिका खेळवण्यासाठी योग्य नाही, पण परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर दुबई सारख्या त्रयस्थ ठिकाणी ही मालिका खेळवली जाऊ शकते. या मालिकेच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील क्रिकेट मालिका पुन्हा सुरू होण्यास मदत होईल, असेही शोएब अख्तरने नमूद केले. दरम्यान, याआधीही शोएब अख्तरने भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका पुन्हा खेळवली जावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा -साऊदीला मिळाला न्यूझीलंडचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार

हेही वाचा -केरळातील गावानं केलं वॉर्नरचं अनुकरण, ५० तरूणांनी केलं मुंडण!

ABOUT THE AUTHOR

...view details