महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 6, 2019, 7:28 PM IST

ETV Bharat / sitara

मालिकेत आलं भावनिक वळण; पुत्र गंगाधरचा मृत्यू बाबासाहेबांच्या आयुष्याला देणार कलाटणी

बाबासाहेबांचा जीवनपट उलगडणाऱ्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेत भावनिक वळण आलंय. आई, वडील आणि मोठा भाऊ हे आनंदाचं छत्र हरपल्यानंतर बाबासाहेबांच्या आयुष्यातली आणखी एक धक्कादायक घटना म्हणजे मुलगा गंगाधरचं निधन.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिका

मुंबई - बाबासाहेब शिक्षणासाठी लंडनला असताना रमाबाईंनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतली. मात्र, अडचणी काही संपत नव्हत्या. घरी दोन वेळच्या जेवणाचीही चिंता, अशा परिस्थितीत लहानग्या गंगाधरची तब्येत बिघडली. डॉक्टरांनीही पैशांअभावी उपचार करण्यास नकार दिला. चिमुकला गंगाधर आजारपणातून बरा होऊ शकला नाही आणि त्याने या जगाचा निरोप घेतला. बाबासाहेब आणि संपूर्ण सकपाळ कुटुंबाला हेलावून टाकणारी ही घटना. लंडनमध्ये बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून रमाबाईंनी गंगाधरच्या निधनाबद्दल बाबासाहेबांना फार उशिरा कळवलं. रमाबाई म्हणजे फक्त मुलांची नाही तर संपूर्ण समाजाची माऊली होती, हे या घटनेतून प्रकर्षाने जाणवतं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिका

गंगाधरच्या निधनाच्या बातमीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रचंड अस्वस्थ झाले. समान अधिकारांसाठी करावा लागणारा संघर्ष, घरी हातभार लावू शकत नसल्याची खंत, लंडनमध्ये अभ्यासपूर्वक लिहिलेला ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध ब्रिटिश प्राध्यापकांकडून नाकारला जाणं आणि अशातच मुलगा गंगाधरच्या निधनाची बातमी या घटनांनी बाबासाहेबांच्या आयुष्यात उलथापालथ केली. पण बाबासाहेब खचले नाहीत.

हिऱ्याला ज्याप्रमाणे तावून सुलाखून झळाळी मिळते त्याचप्रमाणे या घटनांनी बाबासाहेबांना आणखी खंबीर बनवलं आणि हाती घेतलेलं कार्य पूर्ण करण्याची उमेद दिली. बाबासाहेबांचा संघर्ष आणि विचार आजही जनमानसात नवी प्रेरणा देतात. हेच मौल्यवान विचार पोहचवण्याचा प्रयत्न ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेतून केला जातोय. प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या निर्व्याज प्रेमामुळे ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details