छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांबद्दल कितीही वाचलं, बघितलं तरी मन भरत नाही. त्यामुळेच त्यांच्या जीवनावर आधारित ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत अनेक चित्तथराक प्रसंग अनुभवायला मिळत असताना
मराठीजनांचा उर अभिमानाने भरून येत आहे. महाराजांच्या स्वाऱ्यांमुळे प्रेक्षक या मालिकेकडे अधिक प्रमाणात खेचला गेला आहे. आता येणाऱ्या भागांमध्ये पन्हाळगडाच्या कडेकोट वेढ्यातून निसटून विशाळगडावर पोहोचेपर्यंतचा रोमांचकारी थरार अनुभवता येणार आहे.
प्रतापगडाचा पराभव आदिलशहाला चांगलाच जिव्हारी लागला. या पराभवानंतर आदिलशहाने सिद्धी जौहर यास महाराजांच्या बंदोबस्तासाठी पन्हाळ्यास पाठवले. प्रचंड पावसात वेढा चालवणं विजापूरी सैन्यास अशक्य होईल हा छत्रपती शिवरायांचा अंदाज सिद्धीने खोटा ठरवला. या कडेकोट वेढ्यातून निसटून जाण्यासाठी निवडक मावळे घेऊन दुर्गम मार्गाने विशाळगडाकडे भर पावसात रात्रीच्या वेळी निसटण्याची मोहीम महाराजांनी आखली. या मोहिमेतील शिवा काशिदांचे हौतात्म्य, बाजी-फुलाजी बंधूंचा पराक्रम, बांदलांच्या अज्ञात मावळ्यांचे शौर्य आणि बलिदान, विशाळगडाच्या पायथ्याशी महाराजांचा घनघोर संग्राम या साऱ्या पराक्रमी प्रसंगांची गाथा या विशेष भागातून उलगडणार आहे.
स्वराज्यसंघर्षातील रणसंग्रामात सह्याद्रीच्या पर्वतरांगांतून, खडतर मार्गावरून पन्हाळा ते विशाळगड असा प्रवास शिवरायांनी आणि त्यांच्या ३०० बहाद्दर मावळ्यांनी केला. अंगावर शहारे आणणारा या रक्तरंजित पर्वाचा इतिहास सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेच्या येत्या भागांतून उलगडणार आहे. बुधवार १२ मे ते शुक्रवार १४ मे दरम्यान रात्रौ ८.३० वा. या पर्वाचा विशेष भाग सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे. या यशस्वी मोहिमेचे साक्षीदार होत या पराक्रमी इतिहासाला पुन्हा उजाळा देण्यासाठी हे भाग पाहणे एक पर्वणी ठरणार आहे.